कॅथॉलिक रिलिजियस इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे निवेदन
बेळगाव : मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात अनेक निरपराध लोक बळी पडले आहेत. अनेक चर्चना आगी लावण्यात आल्या आहेत. हजारो लोक बेघर होऊन निर्वासितांच्या छावण्यात स्थलांतरित झाले आहेत. येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून सरकारने त्वरित सीबीआयकरवी या हिंसाचाराची चौकशी करावी व गुन्हेगारांना कडक शासन करावे, अशी मागणी कॅथॉलिक रिलिजियस इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. सदर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, की मणिपूर येथे हिंसाचार उसळला आहे. 3 ते 6 मे दरम्यान तो शिगेला पोहोचला. या हिंसाचारामुळे हजारो लोक बेघर झाले आणि निष्कारण निरपराध लोक बळी पडले.
दोन जमातींमधील अंतर्गत संघर्ष हे याचे मूळ कारण आहे. परंतु, त्यामुळे 317 चर्चना, 70 चर्चच्या प्रशासकीय इमारतींना, शाळांना आग लावण्यात आली. किमान 75 ख्रिस्ती बांधव ठार झाले. या हिंसाचाराच्या मागे कोणाचा हात आहे, याची सरकारने सीबीआयद्वारा चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या हिंसाचारामध्ये अनेक मालमत्तांचे नुकसान झाले आहे आणि केंद्र सरकारने बेघर झालेल्यांची घरे तसेच चर्चच्या इमारती पुन्हा बांधून द्याव्यात. सरकारने तातडीने पावले उचलून येथे शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे आणि लोकांच्या सुरक्षिततेची हमी देणे भाग आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे महिला खेळाडूंवर जो अन्याय झाला आहे, त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी आणि या खेळाडूंना न्याय मिळवून द्यावा. तसेच कर्नाटकासह देशाच्या अन्य भागांमध्ये पास्टर्सवरती हल्ले होत आहेत. त्याचाही संघटना निषेध करत असून घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे, हे लक्षात घेऊन सरकारने या सर्व गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर कॅथॉलिक रिलिजियस ऑफ इंडियाचे अध्यक्ष रेव्ह. फादर रिचर्ड अल्मेडा व कॅथॉलिक असोसिएशन ऑफ बेळगावच्या अध्यक्षा क्लारा फर्नांडिस यांच्या स्वाक्षरी आहेत.