सरकारने मागण्या मान्य केल्याने आतषबाजी
बेळगाव : अंगणवाडी कर्मचारी महिलांनी विविध मागण्यांसाठी बेंगळूर येथे अहोरात्र आंदोलन केले होते. त्याला यश आले असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी महिलांनी सिटूच्या नेतृत्वाखाली कित्तूर चन्नम्मा चौक येथे आनंदोत्सव साजरा केला.
अंगणवाडी कर्मचारी महिलांना निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी द्यावा, अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल करावा, मदतनीसना बढती द्यावी, या मागण्या केल्या होत्या. या तीन मागण्या सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर जानेवारी 23 पासून 1 फेब्रुवारीपर्यंत अहोरात्र आंदोलन केले होते. त्यामुळे सरकारने ठोस आश्वासन दिले होते. आता सरकारने या तीन मागण्या मान्य केल्या. त्यामुळे कित्तूर चन्नम्मा चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आता सकाळी 9.30 ते 1 वाजेपर्यंत अंगणवाडी सुरू राहणार आहे. या वेळेत मुलांना केवळ शिक्षण देण्याबाबत मंजुरी दिली आहे. 1.30 नंतर बीईएलओ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इतर कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी मंदा नेवगी, मिनाक्षी दफडे, रेणुका बसर्गी, कृष्णा कानशिवानाचे, उज्ज्वला लाखे, अनिता पाटील, शामला तलवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..