राष्ट्रीय महामार्गाशेजारील बसथांब्याची दुरवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गाशेजारील वैभवनगर परिसरातील बसथांबा पूर्णपणे मोडकळीस आला असून बसथांब्यावरील खुर्च्या आणि मागील बाजूचे पत्रे गायब झाले आहेत. या बसथांब्यावर प्रवाशांना थांबणे धोकादायक बनले आहे. तरीदेखील बसथांब्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र उपनगरातील बसथांब्यांच्या विकासाकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातंर्गत असलेल्या बसथांब्यांवर स्मार्ट बसथांब्यांची उभारणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आली आहे. पण काही ठिकाणी महापालिकेने उभारलेले पत्र्याचे बसथांबा शेड अद्यापही जैसे थै आहेत. काही ठिकाणी हे बसथांबे मोडकळीस आले असून प्रवाशांना धोकादायक बनले आहे. विशेषतः जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर राणी चन्नम्मा चौकातील बसथांबा पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या ठिकाणी उत्तर भागात जाणारे प्रवासी बसची प्रतीक्षा करत थांबतात. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नेहमी गर्दी असते. तरीदेखील येथील धोकादायक बसथांबा हटविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच याच मार्गावर राष्ट्रीय महामार्गालगत वैभवनगरजवळ बसथांबा उभारण्यात आला होता. मात्र या बसथांब्याचे केवळ छत शिल्लक आहे.
धोकादायक बसथांबा हटवा
बसथांब्याच्या मागील बाजूचा पत्रा आणि खुर्च्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे हा बसथांबा नाममात्र आहे. या ठिकाणी बसची प्रतीक्षा करत थांबणे प्रवाशांसाठी धोकादायक आहे. हा बसथांबा बदलण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. अनर्थ घडण्यापूर्वी जीर्ण झालेले धोकादायक बसथांबे हटविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.