वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर आहे. या दौऱयात यजमान बांगलादेश आणि भारत यांच्यात वनडे मालिका तसेच त्यानंतर कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने तो उपलब्ध होऊ शकणार नाही. आता त्याच्या जागी सौराष्ट्रचा जयदेव उनादकटला संधी देण्यात आली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चेतोग्राम येथे सुरू होईल. 31 वषीय जयदेव उनादकटने विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत उनादकटने सर्वाधिक बळी मिळविले असल्याने निवड समितीने त्याची बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड केली आहे. उनादकटने 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये एक कसोटी, 7 वनडे आणि 10 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. 2010 साली उनादकटने एकमेव कसोटी सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. उनादकटने 96 प्रथमश्रेणी सामन्यात 353 गडी बाद केले आहेत. 2019-20 च्या क्रिकेट हंगामात सौराष्ट्रने रणजी स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी सौराष्ट्राचे नेतृत्व उनादकटकडे होते.