आंध्रप्रदेश सरकारवर आरोप ः पंतप्रधान मोदींना पत्र
वृत्तसंस्था/ अमरावती
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी फोन टॅपिंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. नायडू यांनी आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस सरकार विरोधी पक्षांचे नेते, वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी चौकशीचा आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार घटनेच्या कलम 19 आणि 21 अंतर्गत प्राप्त मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे म्हणत नायडू यांनी फोन टॅपिंगसाठी राष्ट्रीय यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. वायएसआर काँगेस सत्तेवर आल्यापासून राज्यातील लोकशाहीवादी संस्थांवर पद्धतशीरपणे हल्ले केले जात आहेत. राज्य निवडणूक आयोग, आंध्रप्रदेश लोक सेवा आयोग यासारख्या संस्थांच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. सत्तारुढ वायएसआर काँग्रेसकडून विरोधी पक्षाचे नेते, वकील, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात असून त्यांना धमकाविले जात आहे. विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला जात असून यात फोन टॅपिंग सामील असल्याचा दावा नायडू यांनी पत्राद्वारे केला आहे.
वायएसआर काँग्रेस सरकार स्वतःच्या राजकीय लाभासाठी अवैध स्वरुपात फोन टॅप करत आहे. हा प्रकार अवैध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून केला जात असल्याचा संशय आहे. हा प्रकार भविष्यात राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकतो. समाजकंटकांच्या हातात अशाप्रकारचे तंत्रज्ञान पोहोचल्यास उच्चपदस्थांना ब्लॅकमेल करत तडजोडीसाठी भाग पाडले जाईल अशी भीती चंद्राबाबू यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
वायएसआर काँग्रेसने लोकशाहीचा तिसरा स्तंभ न्यायपालिकेलाही लक्ष्य केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करत अवैध स्वरुपात फोन टॅप केले जत आहेत. अशाप्रकारचे अवैध फोन टॅपिंग अनियंत्रित झाल्यास देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षेसाठी एक गंभीर धोका निर्माण होणार आहे. अशाप्रकारच्या कारवायांमुळे लोकशाहीची मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ऱहास होत जंगलराज येऊ शकते असे नायडू यांनी म्हटले आहे.