पुणे / प्रतिनिधी :
निवडणुकीच्या वेळी महायुतीमधील घटक पक्षाच्या उमेदवारांना भाजपा आपल्या उमेदवारांपेक्षाही अधिक ताकद देणार आहे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्या वेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 45 पेक्षा अधिक खासदार असतील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, हातकंगणले, कोल्हापूर, माढा, सातारा या लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक पुण्यात पार पडली. त्यानंतर ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा बूथस्तरापर्यंत संपूर्ण कार्यक्रमाची रचना करीत आहे. लोकसभा प्रवास योजनेत 500 पेक्षा अधिक पदाधिकारी व त्यांची टीम काम करणार आहे. त्यासाठी ‘संपर्क से समर्थन’ व नवमतदार नोंदणी केली जात आहे. राज्यातील व केंद्रातील मंत्री आगामी? महिन्यात राज्याचा दौरा करतील. राजकीय व विकासात्मक तयारी केली जात आहे. जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. तर आगामी वर्षभरात 50 हजार रुग्णमित्र तयार केले जातील. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी मतदार साथ देत असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवार तिन्ही नेत्यांसह संसदीय बोर्ड ठरवेल
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सर्व बाबींचा विचार करून आले आहेत. महायुतीवर शंका घेण्याचे कारण नाही, महायुती कमजोर होऊ नये, यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. जागा वाटपाचा संपूर्ण अधिकार हा केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. राज्यातील तिन्ही नेते व केंद्रीय संसदीय बोर्ड उमेदवार ठरवितील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुती वर्षानुवर्षे चालणार
देशातील जनतेला मोदी हे पंतप्रधान म्हणून हवे आहेत. त्यांच्या नवभारताच्या संकल्पाला साथ देण्याकरिता मतदान केंद्रावर जाऊन मतदार कमळाचेच बटन दाबणार आहेत. आम्हीही त्यासाठी काम करीत आहोत. भाजपासोबतची महायुती वर्षानुवर्षे चालणार आहे. चिन्हाचा कोणताही वाद नाही, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये कधीही स्फोट होऊ शकतो
सध्या काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहे. काँग्रेसला विरोधी पक्ष नेता ठरविता येत नाही, अशी अवस्था आहे. त्या पक्षात प्रचंड असंतोष आहे. काँग्रेसमध्ये केव्हाही कोणताही स्फोट होऊ शकतो. 2029 पर्यंत या पक्षाला कोणताही स्कोप नाही, असे भाकीतही बावनकुळे यांनी वर्तविले.