पांजरपोळची उभारणी शाहू महाराज यांच्यामुळेच
सुधाकर काशीद/प्रतिनिधी
घरी आठ-दहा वर्ष राबलेला बैल वार्धक्याकडे झुकू लागला की तो बहुतेकांना अडचणीचा वाटू लागतो. मात्र बैल कसाबाला द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं असते. मग काय करायचे? कोटीतिर्थाच्या मागे असलेल्या पांजरपोळात या बैलाला नेऊन सोडायचे अखेर निश्चित होते. बैल सोडून जाताना धन्याचा पाय पांजर पोळाच्या कमानीत क्षणभर का होईना थबकतो. तिकडे बैल नव्याने शाळेत घातलेल्या मुलासारखा बावरून जातो. त्याची सगळी नजर रस्त्याकडेच्या कमानीकडे आपल्या धन्याकडे लागलेली असते. दोन दिवस तो चाऱयाला तोंड लावत नाही आपण कुठेतरी नव्या जागेत येऊन पडालो आहे हे त्या बैलाच्या हालचालीवरून जाणवते. चार दिवसांनी मात्र त्याला नव्या जागेची जुळवून घ्यावं लागते. आणि या पांजरपोळाचा घटक बनून अखेरपर्यंत राहावे लागते.
कोल्हापुरातला हा पांजरपोळ 1906 साली स्थापन झाला रयतेवर जीवापाड प्रेम करणाऱया छत्रपती शाहू महाराजांनी हा पांजरपोळ काही व्यापाऱयांच्या सहकार्याने सुरु केला आहे हे आज कुणाला सांगूनही पटणार नाही. केवळ घोषणाबाजी किंवा गाजावाजा यात कधीही रमून न गेलेल्या शाहू महाराजांनी मुक्या जनावरांवरील आपल्या भावना या पांजरपोळच्या निमित्ताने वास्तवात उतरवल्या.
1906 च्या दरम्यान कोल्हापुरात गूळ बाजार सुरू झाला. त्यानिमित्ताने गुजरात, कच्छ, भुज या भागातले व्यापारी कोल्हापुरात स्थायिक झाले. त्यांचा गाईवर फार लळा. त्यामुळे वृद्ध झालेल्या गाईंची देखभाल करण्याच्या भावनेने त्यांनी एक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. या संस्थेच्या उभारणीसाठी शाहू महाराजांच्याकडे गेले. आणि शाहू महाराजांनीही कोटीतीर्थाच्या काठावर तब्बल 13 एकर जागा घोडय़ाच्या पागेसह पांजरपोळ संस्थेस दिली. या जागे बरोबरच या जनावरांच्या देखभालीसाठी किंवा या जनावरांना चारा मिळावा यासाठी कुशिरे गावातील सहाशे एकर गवती कुरण आणि बागल चौकातील साडेतीन एकर जागा पांजरपोळ संस्थेसाठी दिली. पहिल्यांदा केवळ गाईंसाठी सुरू झालेल्या या पांजरपोळ संस्थेत हळूहळू कोणत्याही स्वरुपाचे भटके जनावर दाखल करून घेतले जाऊ लागले.
शाहू महाराजांच्या मुक्या प्राण्याबद्दलच्या भावना किती आत्मीयतेच्या होत्या याचे उदाहरण म्हणून या पांजरपोळ संस्थेकडे पहावे लागेल. वर्षाला साधारण चारशे म्हणजे या सव्वाशे वर्षात 60 ते 70 हजारवर जनावरांना या पांजरपोळ संस्थेत आश्रय मिळाला. रस्त्यात फिरणारी भटकी जनावरे (कुत्री वगळून) याठिकाणी महापालिकेच्यावतीने आणून सोडली जाऊ लागली. बैल, गाय, म्हैस, शेळी, घोडा यासारखी जनावरे लोक स्वतःहून या ठिकाणी आणून सोडू लागले. या संस्थेत जनावरांची एखाद्या माणसासारखी देखभाल होणार याची खात्री लोकांना असल्याने पांजरपोळ संस्थेत जनावरांची कायम रीघ लागली. जनावरांची देखभाल व्यवस्थित व्हावी. त्यांच्यावर औषधोपचार व्हावे यासाठी राजश्री शाहू महाराजांनी या पांजरपोळ साठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे भटक्या जनावरांना सावली मिळाली. अन्न मिळाले. आणि रस्त्यावर तडफडून मरण्याचा क्षण त्यांच्या वाटय़ाला आला नाही.
शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनीही या पांजरपोळ संस्थेकडे लक्ष कायम ठेवले. या संस्थेचा कारभार शाहू महाराजांच्या मार्गदर्शनानुसार झाला. आणि या संस्थेचे चा कार्यभार परवानाधारक गुळ व्यापारी यांनीच पहाण्याचा शिरस्ता पडला. मुक्या जनावरांच्या साठी संस्था करत असलेले हे काम पाहून अनेक व्यक्ती संघटनाही संस्थेस मदत करतात. संस्थेच्या शाहू मिल जवळच्या 13 एकर जागेपैकी 10 एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी ताब्यात घेण्यात आली. संस्थेकडून अतिशय अल्प मोबदल्यात महापालिकेने ही जागा खरेदी केली. या जागेवर मुक्या प्राण्यांची देखभाल मोफत केली जाते. त्यामुळे ही जागा याच कामासाठी आवश्यक आहे असा विचार कुणीही केला नाही. आणि या संस्थेच्या अतिरिक्त जागेवर एक औद्योगिक वसाहत उभी राहिली.
राजर्षी शाहू महाराजांच्या लोकोपयोगी धोरणाबद्दल आणि कृतीबद्दल कृतज्ञता कशी आणि किती व्यक्त करायची हा एक प्रश्नच आहे. कारण त्यांचे प्रत्येक काम लोकोपयोगी आहे. मात्र मुक्या जनावरांसाठी त्यांनी केलेले हे काम आगळेवेगळे असेच आहे. राजा कोण कोणत्या दृष्टीने आपल्या प्रजेकडे आणि मुक्या जनावराकडे आत्मियतेने पाहू शकतो याचेच हे उदाहरण आहे. आता शाहू मिल मध्ये शाहू कृतज्ञता पर्वा निमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. कधी नव्हे ते लोक मोठय़ा संख्येने शाहू मिलमध्ये येत आहेत. आणि याच शाहू मिलच्या पिछाडीस शाहू महाराजांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली पांजरपोळ संस्था आहे. आजही ती तितक्याच ताकदीने मुक्या जनावरांच्या साठी काम करत आहे.
कसाबाकडे जनावर नाही…
त्या पांजरपोळ संस्थेत कुत्रे सोडून कोणतेही जनावर एखाद्या व्यक्तीने आणून सोडले तर ते दाखल करून घेतले जाते. त्याच्यावर उपचार केले जातात. त्याच्या चाऱया पाण्याची सोय केली जाते. रस्त्यावर कोठेही जखमी अवस्थेत पडलेले जनावर किंवा एखादा पक्षी त्याला देखील या पांजरपोळ संस्थेत दाखल करून घेतले जाते. उपचार करून बरे झाल्यानंतरच त्या पक्षाला पुन्हा सोडले जाते मात्र या पांजरपोळ संस्थेत दाखल केलेले एकही जनावर कसाबाला विकले जात नाही. त्याची मरेपर्यंत देखभाल केली जाते.
भटक्या गाढवांनाही आसरा…
या पांजरपोळ संस्थेत अनेक भटके गाढव आणून महापालिकेने, नगरपालिकेने सोडली आहेत. गाढव फार उपद्रवी प्राणी. पण या पांजरपोळ संस्थेत त्याच्यावर ही निशुल्क उपचार केले जातात.;व मालकाने राबवून घेऊन अखेरच्या क्षणी रस्त्यावरून सोडून दिलेल्या गाढवाची मरेपर्यंत चारा पाण्याची जबाबदारी पांजरपोळ संस्था उचलते.