गोवा डेस्क प्रभारी सी. टी. रवी यांनी केले स्पष्ट : ’त्या’ आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही मोपला ’मनोहर पर्रीकर’ असे पूर्ण नाव देणार
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ फेररचनेच्या चर्चेला पूर्णविराम देताना भाजपचे ज्ये÷ नेते तथा गोवा डेस्क प्रभारी सी. टी. रवी यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करायचेच झाल्यास त्यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेतील. तो अधिकार त्यांचाच आहे. फेरबदल करायचे असतील तर ते करू शकतात, असेही ते म्हणाले.
दि. 11 डिसेंबर रोजी मोप विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकांच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर गोवा भेटीवर आलेल्या रवी यांनी मंगळवारी पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत सर्वांना मार्गदर्शन केले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली, तसेच पक्षाच्या नियमित संघटनात्मक बैठकांचा भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असे पुढे सांगितले. या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, बाबू कवळेकर, दामू नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आठही आमदार भाजपात आनंदी
सुमारे तीन महिन्यांपूर्वी आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही त्यापैकी कुणालाही अद्याप मंत्रीपद किंवा एखादे महामंडळही देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली असल्याच्या चर्चा आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रवी गोव्यात आल्याची चर्चा होती. त्यासंबंधी विचारले असता, रवी यांनी तसा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट केले. उलटपक्षी भाजपात प्रवेश केलेले आठही आमदार आनंदी आहेत. त्यांच्यात कोणतीही नाराजी नाही, असे रवी यांनी सांगितले.
फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार
भाजपात प्रवेश केला म्हणजे सर्वांनाच खुश करणे शक्य नाही, असे स्पष्ट करतानाच रवी यांनी सध्यातरी मंत्रिमंडळात फेरबदलाबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. अनेकदा मंत्रिमंडळात बदलासंदर्भात पक्षातर्फे सूचना देण्यात येतात. परंतु त्यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. फेरबदल हे मुख्यमंत्र्यांचे काम आहे, पक्षाचे नाही, असे ते म्हणाले.
येणाऱया काळात सर्वांना योग्य जबाबदाऱया
नुकतेच गोव्यात आलेल्या पंतप्रधानांच्या भेटीवेळी हे आठही आमदार उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी कोणतीही मागणी केली नाही, यावरून त्यांच्यात कोणतीही नाराजी नाही हेच स्पष्ट होते, असे रवी यांनी सांगितले. त्यांची नाराजी या केवळ अफवा आहेत, प्रत्यक्षात तसे काहीच नाही. ते सर्वजण खुश आहेत आणि येणाऱया काळात सर्वांना योग्य जबाबदाऱयाही देण्यात येतील, असे रवी यांनी स्पष्ट केले.
लोकांशी संपर्क वाढवा, पक्ष मजबूत करा : रवी
दरम्यान, गोवा भेटीवेळी लोकसंपर्कात राहण्याचा जो मंत्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिला होता तोच मंत्र मंगळवारी सी टी रवी यांनी दिला. 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून लोकांशी संपर्क वाढवा, पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, असे त्यांनी राज्यातील पक्षाच्या नेत्यांना सांगितले.
मोपला मनोहर पर्रीकरांचेच पूर्ण नाव देणार
मोपा विमानतळाच्या नावावरून झालेल्या वादाबाबत विचारले असता, विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचेच नाव देण्यात आले असून, त्याबाबत कोणताही वाद नाही. परंतु लोकभावनेचा आदर ठेऊन लवकरच ते नाव पूर्ण स्वरुपात म्हणजेच ’मनोहर पर्रीकर विमानतळ’ असे करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर तेथे त्यांचे मोठे पोटेटही लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.