स्थानिक आघाडय़ांची बाजी : सतेज पाटील, कोरे, मुश्रीफ, पी.एन. यांनी राखले गड
कोल्हापूर/संतोष पाटील
जिह्यातील 430 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा नवनवी राजकीय समिकरणांची जोडणी घातली. बाळासाहेबांची शिवसेनेच्या एन्टीने उत्कंठा ताणलेल्या या निवडणुकीत जिंकण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी मतदान करण्याची परंपरा कोल्हापूकरांनी राखली. गडहिंग्लज-चंदगड आणि आजरा तालुक्यात सर्वाधिक सत्तांतर झाले. गगनबावडा आणि ‘दक्षिण’चा गड आ. सतेज पाटील-आ. ऋतुराज पाटील यांनी राखला. आ. विनय कोरे यांनी शाहुवाडी, पन्हाळा आणि हातकणंगलेतील ताकद कायम असल्याचे दाखवून दिले. करवीरमध्ये आ. पी. एन. पाटील यांचे पर्यायाने काँग्रेसचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले. शिरोळ तालुक्यात माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुलाल उधळला. महाडिक गटाच्या साथीने भाजपने या निवडणुकीत स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिले. कोल्हापुरात सत्तांतराचा गुलाल जल्लोषात उधळला असला तरी सर्वपक्षीय नेत्यांची सरमिसळ आणि गटाच्या राजकारणाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील 18 ग्रामपंचायतीमध्ये माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील गटाने विजयाचा गुलाल उधळला. महाडिक गटाने कंदलगाव, गांधीनगर आणि कावणे याठिकाणी विजय मिळवला. जिह्यातील सर्वात मोठय़ा शिरोली पुलाची या होमपिचवर महाडिक गटाने विरोधकांवर मात केली. करवीर तालुक्यात काँग्रेसने 13 तर स्थानिक आघाडय़ांनी 12 ठिकाणी विजयाची मोहर उमठवली. आ. पी.एन पाटील गटाने तालुक्यात सर्वाधिक गावात सत्ता स्थापन केली. माजी आमदार चंद्रदीप नरके गटाने ठळकपणे आपले अस्तित्व राखले आहे. गगनबावडा तालुक्यातील 21 पैकी 18 ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचा सरपंच करुन सतेज पाटील गटाने तालुक्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व सिध्द केले.
शाहुवाडी तालुक्यातील 44 पैकी अकरा गावातील सत्ता जनसुराज्य पक्षाने हाती घेतली. उध्दव ठाकरे यांची शिवसेना सहा तर राष्ट्रवादी-ठाकरे शिवसेना युतीने 19 गावात गुलाल उधळला. तालुक्यात आ. विनय कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील या दोन्ही गटांनी आपले अस्तित्व अबाधित राखले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कायम असल्याचे दिसून आले. राधानगरी तालुक्यात सर्वच 57 ठिकाणी सरमिसळ राजकारणातून स्थानिक आघाडय़ांनी यश मिळाले. सर्वच पक्षीय नेते आणि गावातील गटांची विभागणी झाल्याने एका गावात तीन नेते विजयाचे दावेदार बनले. हातकणंगले तालुक्यात 39 पैकी 11 ठिकाणी आ. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष आणि सहा ठिकाणी भाजप असे 17 गावात बाजी मारली. काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला तालुक्यात मोठा धक्का बसला.
शिरोळ तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 11 ग्रामपंचायती माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजयाचा दावा केला. कागल तालुक्यातील 26 गावापैकी हसन मुश्रीफ गटाचे दहा गावात सरपंच झाले. राजेगट आणि खासदार मंडलिक गट प्रत्येकी सहा तर संजयबाबा घाटगे चार गावात सत्ता मिळवली.
पन्हाळा तालुक्यात मतमोजणी झालेल्या 40 पैकी 19 गावात जनसुराज्य पक्षाने गुलाल उधळला. नरके गटाने 16 तर स्थानिक आघाडय़ांनी 11 जागांवर विजयी झाले. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात सर्वाधिक सत्तांतर झाले. गडहिंग्लज तालुक्यात 30 पैकी 20 गावात सत्तांतर झाले. हेच चित्र चंदगड तालुक्यात दिसून आले. येथील 40 पैकी 20 गावात सत्ताधायांना धक्का बसला. आजरा तालुक्यातील 31 पैकी 17 गावात सत्ताधारी तर 14 गावात सत्तांतर झाले. भुदरगड तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समान विजयाचा दावा केला आहे.
कोणाचाही एकछत्री अंमल नाही
जिह्यातील मतदारांचा शेवटपर्यंत अंदाज येत नसल्याने हा धक्कादायक निकालासाठी प्रसिध्द आहे. कोल्हापूर शहर दक्षिण आणि गगनबावडा तालुक्यात आ. सतेज पाटील गटाने एकतर्फी विजय मिळवला. करवीर तालुक्यात गटातटाच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी अस्तित्व राखले असले तरी काँग्रेस बालेकिल्ला साबूत ठेवल्याचे ग्रामपंचायतीचा निकाल दर्शवतो. हातकणंगलेत तालुका जनसुराज्य आणि भाजपच्या मागे राहिला. उर्वरित जिह्यातील तालुक्यात एकच नेता किंवा पक्षाच्या मागे संपूर्ण तालुका राहिल्याचे चित्र नाही. तालुक्यात कोणत्याच एका पक्षाला किंवा नेत्याला पाठबळ दिले नाही. संमिश्र राजकारणाने बाजी मारली. पन्हाळा-शाहुवाडी मतदार संघात आ. विनय कोरे यांची राजकीय ताकद दिसली असली तरी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी राष्ट्रवादीच्या साथीने तालुक्यात ठाकरे शिवसेनेचे अस्तित्व प्रकर्षाने राखल्याचे दिसून येते
भविष्याचा वेध घेणारी निवडणूक
२०२४ च्या विधानसभेच्या रणांगणात शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट आमने-सामने उभे टाकण्याची शक्यताच अधिक आहे. ग्रामपंचायत निकालाचे प्रतिध्वनी जिल्हापरिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीत उमठणार आहेत. महाविकास आघाडीपुढे भाजप आणि शिंदे गटाचे कडवे आव्हान असेल. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गट आणि ठाकरे शिवसेनेच्या जिह्यातील नेतृत्वाने आपले पॉलिटिकल नेटवर्क अधिक प्रबळ करण्याचा प्रयत्न केला.