उत्पादनात वाढ, 1200 ते 1400 रुपये क्विंटलचा दर : बाजारात वर्षभर रताळी उपलब्ध
बेळगाव : उन्हाळी रताळी काढणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शिवारात रताळी काढणीची लगबग पहावयास मिळत आहे. अलीकडे शेतकऱ्यांनी बटाटा पिकांकडे पाठ फिरवली आहे. आता पावसाळ्याबरोबर उन्हाळ्यातही रताळी उत्पादनाकडे कल वाढला आहे. यंदा साहजिकच रताळी उत्पादन वाढले आहे. पावसाचा अनिश्चितपणा, वाढती मजुरी, वाढत्या रासायनिक खतांच्या किंमती, यामुळे शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. दरम्यान, बटाटा उत्पादनात मोठी घट होऊ लागली आहे. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांचा रताळी उत्पादनाकडे कल वाढल्याचे दिसत आहे. तालुक्यातील कुद्रेमनी, बेळगुंदी, बेळवट्टी, बिजगर्णी, राकसकोप, सोनोली, कल्लेहोळ, बेकिनकेरे, हंदिगनूर, कंग्राळी, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी आदी भागात उन्हाळी रताळ्याची लागवड करण्यात आली आहे. साधारण नव्वद दिवसानंतर या पिकाची काढणी हाती घेण्यात आली आहे. य् ांदा सप्टेंबरपासून रताळ्याचा भाव टिकून आहे. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 1200 ते 1400 रुपये क्विंटल रताळ्यांना दर आहे. पावसाळ्यात लावलेल्या रताळ्यांना समाधानकारक दर मिळाल्याने उन्हाळी रताळी लागवड वाढली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात वर्षभर रताळी उपलब्ध होऊ लागली आहे. अलीकडच्या काही वर्षात बटाट्याची लागवड घटली आहे. त्याठिकाणी रताळी लागवड केली जात आहे. त्यामुळे रताळी लागवडीचे क्षेत्रदेखील वाढले आहे. लागवडीला बियाण्याचा खर्च नाही. केवळ शेणखत, रताळीवेल, रासायनिक खत, इतकाच लागवडीसाठी खर्च येतो. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत रताळ्याला खर्च कमी होतो. त्यामुळे साहजिकच रताळी वेल लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे.
काळ्या आणि लाल मातीत उत्पादन
रताळी वेल लागवड काळ्या आणि लाल मातीत देखील केली जाते. त्यामुळे रताळ्याचे उत्पादन वाढले आहे. पावसाळ्याबरोबर उन्हाळ्यातही रताळी लागवड वाढली आहे. बेळगावच्या रताळी चविष्ट आणि स्वादिष्ट असल्याने विशेष मागणी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारासह एपीएमसीत रताळ्याची विक्री होऊ लागली आहे. विशेषत: भाजीपाला व इतर पिके कमी करून काही शेतकऱ्यांनी रताळी लागवड वाढवली आहे.
उत्पादन समाधानकारक : विष्णू पाटील (हंदिगनूर-शेतकरी)
बटाटा आणि भाजीपाला उत्पादन म्हणावे तसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात रताळ्याची लागवड केली आहे. उत्पादनदेखील समाधानकारक झाले आहे. शिवाय दरदेखील योग्य मिळू लागला आहे.
उत्पादन क्षेत्र वाढले : आर. बी. नायकर, (तालुका कृषी अधिकारी)
तालुक्यात यंदा उन्हाळी रताळी लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. इतर पिकांच्या तुलनेत खर्च कमी असल्याने शेतकरी रताळी वेल लागवडीकडे वळू लागले आहेत. पावसाळ्यातदेखील लागवडीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे यंदा चार महिने काढणी सुरू होती.