अचानक आलेल्या पाण्याच्या लोटाने ग्रामस्थांना शंका, मामलेदार कार्यालयाकडून पाहणी
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात 2009 साली आलेला महापूर हा ढगफुटीचा की, कैगा धरणाचे पाणी सोडल्याचा परिणाम होता हा प्रश्न अनुत्तरित असतानाच 30 रोजी रात्री खोतीगाव पंचायत क्षेत्रातील अभयारण्य कक्षेत येणाऱया नडके भागात ढगफुटीनंतर जसे पाण्याचे लोट वाहू लागतात तशा पद्धतीचा प्रकार दिसून आल्याने या वाडय़ावरील लोकांची घाबरगुंडी उडाली आहे. विशेष म्हणजे मागच्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली असताना शेतातून वाट मिळेल त्या भागातून पाणी वाहत असल्याचे आणि नवीनच ओहोळ तयार झाल्याचे पाहून शेतकरी आणि अन्य ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
2009 साली कुसके डोंगरावर ढगफुटी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी कुसके डोंगरावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह प्रत्यक्ष दिसत होता, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली होती. नडके आणि केरी हे भाग जोडलेले असून यावेळी केरीच्या डोंगरमाथ्यावरून अकस्मात पाण्याचा प्रवाह वाहू लागला. या ठिकाणी एक नदी वाहत असून नवीन आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे नवीनच ओहोळ तयार झालेला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
या भागातील शेतकऱयांनी भातशेतीची लागवड केलेली असून या भातशेतीमधूनच नवीन पाण्याचा प्रवाह गेला आहे. भातशेतीमध्ये मातीचा ढिगारा त्याचप्रमाणे दगड-धोंडे येऊन पडले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हा नेमका कसला प्रकार आहे याबाबतीत सर्व जण अनभिज्ञ असून काणकोणच्या मामलेदार कार्यालयात यासंबंधीची कल्पना दिल्यानंतर मामलेदार कार्यालयातील विस्तार अधिकारी रोहिदास गावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी आणि पंचनामा केला आहे.