मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
सांखळी : गोवा स्वयंपूर्ण करणे हे आपले ध्येय असून त्यासाठी सरकारी यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्रशासन तुमच्या दारी’ अंतर्गत आजच्या दुसऱया दिवशी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी साखळी मतदारसंघातील विविध पंचायतीमध्ये उपस्थिती लावून जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. सूर्ला पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले सरकार सदैव जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत फसव्या अफवांना जनतेने बळी न पडता सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची विनंती केली. सुर्ला सारख्या छोटय़ाशा गावात आज स्वयंपूर्ण मित्राच्या सहकार्याने अनेक यशस्वी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगून शंभर पेक्षा अधिक महिलांना कला कौशल्याचे प्रशिक्षण देऊन काथ्याकाम, कुणबी साडी विणकाम करण्याचे व्यवसाय सुरू करण्यास मदत केल्याचे सांगितले. 18 वर्षे पडीक असलेली शेतजमीन स्वयंपूर्ण मिशन अंतर्गत स्वयंपूर्ण मित्राच्या सहकार्याने 16 लाख रुपये खर्च करून लावगडीखाली आणण्याची किमया सुर्लातील शेतकऱयांनी करून दाखविली त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर गोपाळ सुर्लकर, जिल्हा पंचायत सदस्य, श्वेतिका सचन, आय. ए. एस. अधिकारी, निलेश धायगोडकर, उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा, स्थानिक सरपंच विश्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगीणकर, सुभाष फोंडेकर पंच दिनेश मडकईकर, शाणू सुर्लकर, सहिमा गावडे, सुचिता गावकर शैलेश काणेकर, स्वयंपूर्ण मित्र व अन्य उपस्थित होते. तद्नंतर, श्वेतिका सचन (आय.ए.एस.), नीलेश धायगोडकर-उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा यांनी स्थानिक लोकांच्या समस्या व सूचना ऐकून घेतल्या व स्वयंपूर्ण गोवा मिशन अंतर्गत केलेल्या कामांची पाहणी केली.