प्रतिनिधी / बेळगाव
जैन धर्मियांच्यादृष्टीने चतुर्मासात असणाऱया पर्युषण पर्वाची सांगता गुरुवारी एका कार्यक्रमाद्वारे झाली. पर्वकाळात नियमानुसार उपवासाचे आचरण केलेल्या सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये धर्मबांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते, अशी माहिती धर्मबांधवांच्या संघातर्फे देण्यात आली. श्वेतांबर जैन धर्म बांधवांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य आचार्य भगवान अजित शेखर श्री महाराज यांचे पट्ट शिष्य पन्यास प्रवर, श्री ओंकार शेखर विजयजी (आदी ठाणा 2) आणि साध्वी भगवंत यशप्रभा श्रीजी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य श्रेयांस प्रभाजी (आदी ठाणा 2) यांच्या सानिध्यामध्ये चतुर्मास कार्यक्रम पार पडला. त्यांच्या प्रेरणेने चातुर्मासातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
45 दिवसांच्या कालावधीतील विविध उपक्रम झाले. यामध्ये 36 उपवास करण्यात येतात. या कालावधित उपवास आचरण करणारे सदस्य फक्त गरम पाणी सेवन करून उपवासाचे आचरण करतात. हा उपवास पूर्ण केलेले एकूण 40 सदस्य आहेत. या सदस्यांपैकी अभिषेक संघवी या सदस्याने सलग 31 दिवस उपवास केला आहे. त्याचप्रमाणे आठ दिवसांच्या उपवासाचे आचरण 78 सदस्यांनी केले. विशेष म्हणजे यामध्ये ध्याना अभिषेक संघवी या अकरा वर्षांच्या बालिकेने 36 उपवास पूर्ण केले आहेत.