डी. के. शिवकुमार : कुमठा येथे काँग्रेसचा जनजागृती मेळावा
प्रतिनिधी /कारवार
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाराशेहून अधिक इच्छुकांनी तिकिटासाठी अर्ज केले आहेत. यावरून काँग्रेसवरील विश्वासाचा अंदाज येतो. आगामी विधानसभा निवडणुकीत 140 ते 150 मतदारसंघ काबीज करून काँग्रेस पक्ष सत्ता हस्तगत करेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.
कारवार जिल्हय़ाच्या कुमठा येथील मणकी मैदानावर आयोजित जनजागृती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘ऑपरेशन कमळ’द्वारे भाजपमध्ये गेलेले अनेकजण काँग्रेसमध्ये दाखल होण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 30 ते 35 नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यल्लापूरचे माजी आमदार व्ही. एस. पाटील यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व नेत्यांना काँग्रेसचे दरवाजे खुले केले जातील. होन्नावर येथील परेश मेस्ता मृत्यू प्रकरणासह भाजपला विविध क्षेत्रात आलेले अपयश जनतेसमोर आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
27 लाख मतदारांची नावे यादीतून गायब
आगामी निवडणुकीत गैरमार्गाने सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने मतदारयादीतून 27 लाख जणांची नावे वगळली आहेत. याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका कुटुंबातील पाचपैकी दोन मतदारांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. प्रत्येक मतदाराने मतदार यादीतील आपले नाव तपासण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या दुटप्पी धोरणावर जोरदार हल्ला चढविताना शिवकुमार पुढे म्हणाले, भाजपचे नेते जातीयतेच्या आधारावर निवडणुका लढवितात. या उलट काँग्रेसमध्ये सर्व समुदायांना समानतेची वागणूक दिली जाते. ‘ऑपरेशन कमळ’द्वारे सत्ता मिळविलेल्या भाजपला जनतेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात अपयश आले आहे. भविष्यात काँग्रेस सतेत आल्यास किनारपट्टीवासियांसाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.