पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची नावे घेतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या जतन व संवर्धनासाठी कोणी काहीच केले नसून, गडकोटांकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याची खंत छत्रपती संभाजीराजे यांनी येथे व्यक्त केली. सरकारची किल्ल्यांची दत्तक योजना फक्त पर्यटन वाढविण्यासाठी आहे. मात्र गड-किल्ल्यांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन-संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुरज गुरव लिखित आणि बायफोकल्स पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित ‘माझं गडप्रेम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ दुर्गअभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, लेखक सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, वनविभागाचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील, ‘राज्य उत्पादन शुल्क, पुणे’चे अधीक्षक चरणसिंह राजपूत, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुरातत्व संशोधक तसेच दुर्ग अभ्यासक सचिन जोशी आदी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, रायगडाच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मात्र, नोकरशाहीच्या विविध जटील नियमांमध्ये गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन अडकून पडले आहे. इतिहासाला बाधा न पोहोचवता शिवाजी महाराजांचा इतिहास गाडला जाणार नाही, याची दक्षता घेऊन किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे.
घाणेकर म्हणाले, राज्य सरकारतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा सत्कार, सन्मान केला जातो. परंतु, पदरमोड करून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी एकही पुरस्कार किंवा गौरव नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा 350 वे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने तरी गडकिल्ले संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार व्हावा.