अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, देहात असलेला जीवात्मा हा माझाच अंश असतो. मी, प्रकृतीने धारण केलेल्या देहाला आणि आत्म्याला मी वेगळेपणाने पाहू शकतो कारण मी देह आणि आत्मा यापेक्षा वेगळा आहे. अतृप्त राहिलेल्या वासनांमुळे मन एका देहातून दुसऱया देहात प्रवेश करते. नवा देह अतृप्त राहिलेल्या वासनेच्या पूर्तीसाठी अनुकूल असतो. ते नव्या देहात इतके रममाण होते की, त्याला पूर्वीच्या देहाची आठवणही होत नाही. म्हणून माणसाला पूर्वजन्म आठवत नाहीत. जिवात्म्याला जन्म आणि मरण ही दोन्हीही नसतात. जन्म आणि मृत्यु हे फक्त देहालाच आहेत. आत्मा आहे तो नित्य मुक्त व शाश्वत आहे. मन मात्र निरनिराळय़ा इच्छा करत असल्याने त्यांच्या तृप्तीसाठी, देहाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय होण्याला ते कारणीभूत होते. सहाजिकच संसार म्हणून जो काही आहे त्या मनाने केलेल्या कल्पना होत. इंद्रियांचे सर्व व्यापार मनामुळेच होतात आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मन देहातील अहंकाराला गोंजारत असते. त्यामुळे प्रकृतीने निर्माण केलेला देह मी कर्ता आहे असे समजत असतो. त्याची सर्व धडपड विषय प्राप्तीसाठी चालू असते. खरं म्हणजे विषयांची कार्यसिद्धी होणे किंवा देहाच्या ठायी ‘मी’ पणा असणे हे सर्व मिथ्याच होय. समोर दिसत असूनही निरर्थक असलेल्या गोष्टीला मिथ्या असे म्हणतात. देहाचे तसेच आहे. त्याच्या योगाने संसारबंधनांत मात्र गुंतावयास होते. वास्तविक पाहता नरदेहाचा उपयोग माझ्या प्राप्तीसाठी करायचा असतो पण आयुष्यामध्ये लोक विषयसुखातच गुंतून पडतात. त्यांच्या अशा वागण्याची तुलना अमृत विकून पेज पिणे किंवा रत्ने देऊन कोंडा घेणे याच्याशी करता येईल. ते असे वागतात कारण त्यांना आयुष्याची किंमतच नसते. लाखो किंवा कोटय़वधि धन खर्च केले, तरी आयुष्याचा एक क्षणही मिळावयाचा नाही. असे मौल्यवान आयुष्य जी माणसे विषयासाठी खर्च करतात, ती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारी असतात. म्हणून त्यांना कपाळकरंटी व अत्यंत मूढ म्हणावेसे वाटते. देह हाच मुळी काल्पनिक आहे. तेव्हा त्यातील अभिमानही काल्पनिकच होय. तोच देहबुद्धीचा मीपणा आणि दृढ बंधन लावून देतो. म्हणून देहाचे मीपणच जर सोडून दिले, तर मग जन्म कशाचा आणि मरण तरी कशाचे? त्या वेळी संसारच नाही असे समज. मग संसारबंधन कुठून येणार? लहान मुलांनी ऐकावे म्हणून त्यांना बागुलबुवाची भीती दाखवतात पण प्रत्यक्षात बागुलबुवा नसतोच! त्याप्रमाणे मनुष्य देहाला खरे समजतो आणि लोक काय म्हणतील म्हणून घाबरत असतो. प्रत्यक्षात देह हा मुळातच खोटा व काल्पनिक आहे. खेळण्यातल्या भावलीला मूल होईल हे समजणे जसे निरर्थक असते त्याप्रमाणे मी देह आहे या समाजामुळे होणाऱया इच्छा निरर्थक असतात परंतु त्या खऱया मानल्यामुळे देहाला इच्छा, तिरस्कार, सुख, दुःख इत्यादि विकार जडतात. त्यानुसार देहापेक्षा वेगळय़ा असलेल्या आत्म्याच्या चैतन्याच्या प्रकाशाने मन हे शुभाशुभ कर्मे करीत असते. म्हणून येथे सारे विकार हे मनानेच आहेत. कर्माकर्म हेही मनानेच केलेले आहे असे समज. जन्ममरण हेही मनानेच केलेले आहे आणि स्वर्गनरकात जाणे हेही मनःकृतच होय. जीवापासून वेगळे असलेल्या शरीराच्या या निरनिराळय़ा काल्पनिक अवस्था आहेत परंतु अज्ञानामुळे, गुणांच्या संगतीने आत्मा यांना आपला समजतो आणि विवेक जागृत झाल्यावर त्यांना सोडूनही देतो. आत्मा हा स्वभावतःच भिन्न आहे. तो ज्ञानमय असून ज्ञानस्वरूप आहे. त्याला मन स्पर्शसुद्धा करू शकत नाही आणि शुद्ध तत्त्वामध्ये अभिमानही असत नाही. मन आणि अभिमान ह्यांना मायाच उत्पन्न करते. अभिमानानेच गुणांना उदयास आणले आहे आणि त्या गुणांनी मायात्मक विकारसामुग्रीसह हा देह तयार केला आहे. देहाजवळ जशी छाया असते, त्याप्रमाणेच आत्मस्वरूपामध्ये मिथ्यारूप माया असते. आत्मा हा शुद्ध असून देह हा मलिन आहे.
क्रमशः