राजस्थानचे मुख्यमंत्र्यांकडून खोटी स्तुती
वृत्तसंस्था/ जयपूर
राजकीय संकटावेळी राज्य सरकार पाडविण्यास सचिन पायलट गटाला सहकार्य न केल्याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी मुख्यमंत्री अन् भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचे कौतुक केले आहे. गेहलोतांच्या कौतुकामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. गेहलोतांनी षड्यंत्राच्या अंतर्गत कौतुक केले आहे. 2023 मध्ये होणाऱ्या पराभवाच्या भीतीपोटी गेहलोत खोटं बोलत आहेत. गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केला असून शाह यांचा प्रामाणिकपण आणि सत्यनिष्ठा सर्वजण ओळखतात असे उद्गार राजे यांनी काढले आहेत.
माझ्या जीवनात गेहलोतांइतका कुणीच माझा अपमान केलेला नाही. 2023 च्या निवडणुकीत होणाऱ्या ऐतिहासिक पराभवाच्या नामुष्कीपासून वाचण्यासाठी गेहलोत अशा कथा रचत आहेत. परंतु त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही असे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.
..तर आमदारांवर एफआयआर नोंदवा
लाच देणे अन् घेणे दोन्ही कृत्यांना गुन्हा मानले जाते. जर काँग्रेसच्या आमदारांनी पैसे स्वीकारले असतील तर त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात यावा. स्वत:च्याच पक्षात होत असलेली बंडखोरी अन् कमी होत चाललेला जनतेचा पाठिंबा पाहून बिथरल्यानेच गेहलोत आता असत्याचा आधार घेत असल्याचा आरोप राजे यांनी केला आहे.
आमदारांच्या घोडेबाजारात गेहलोत तरबेज
आमदारांच्या घोडेबाजारात अशोक गेहलोत हेच महारथी आहेत. 2008 आणि 2018 मध्ये अल्पमतात असल्याने गेहलोतांनी आमदारांचा घोडेबाजार केला होता. त्या काळात भाजप तसेच काँग्रेसलाही बहुमत मिळाले नव्हते. आम्ही देखील सरकार स्थापन करू शकलो असतो, परंतु घोडेबाजार भाजपला मान्य नव्हता. तर याच्या उलट गेहलोत यांनी आमदारांना खरेदी करत सरकार स्थापन केले होते असा दावा राजे यांनी केला आहे.
गेहलोतांच्या विधानामुळे खळबळ
गेहलोत यांनी रविवारी राज्य सरकार पाडविण्यास सहकार्य न केल्याने वसुंधरा राजे यांचे कौतुक केले होते. यावेळी त्यांनी भाजमधून बडतर्फ आमदार शोभारानी कुशवाह तसेच वसुंधरा राजे आणि कैलास मेघवाल यांचे कौतुक केले होते. शोभारानी यांनी काँग्रेसला साथ दिल्याने भाजपला धोबीपछाड मिळाला होता. राजस्थानात पैशांच्या बळावर निवडून आलेले सरकार पाडविण्याची परंपरा कधीच राहिली नसल्याचे मेघवाल अन् राजे यांनी म्हटले होते. शोभारानी कुशवाह यांनी वसुंधरा राजे अन् कैलास मेघवाल यांची भूमिका जाणून घेतल्यावर काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा गेहलोत यांनी केला.