सौदी अरेबियात अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारासोबत डोवाल यांची चर्चा : मध्यपूर्वेत चीनचा प्रभाव कमी करणारा प्रकल्प
► वृत्तसंस्था/ रियाध
अरब देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने एक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रकल्पात भारतालाही सामील करण्यात आले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याकरता अमेरिका, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातच्या सुरक्षा सल्लागारांसोबत चर्चा केली आहे. या चारही देशांदरम्यान आखाती देशांना अरब देशांशी जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पावर चर्चा झाली. या रेल्वेजाळ्याला बंदर आणि सागरी मार्गाद्वारे भारताशी जोडले जाणार आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. व्हाइट हाउसचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे.
व्हाइट हाउसच्या प्रकल्पासाठी आय2यु2 फोरम अंतर्गत मागील 18 महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. या फोरममध्ये अमेरिका, इस्रायल, भारत आणि संयुक्त अरब अमिरात सामील आहे. हा फोरम मध्यपूर्वेत पायाभूत प्रकल्पांची रणनीति निश्चित करण्यासाठी 2021 मध्ये स्थापन करण्यात आला होता. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेत कुठल्याच देशाने चीनचे नाव घेतले नाही, परंतु हा प्रकल्प चीनचा प्रभाव कमी करण्यासाठीच हाती घेण्यात आल्याचे सर्व जाणून असल्याचे विधान फोरममध्ये सामील एका इस्रायली अधिकाऱ्याने केले आहे. मध्यपूर्वेत चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी या प्रकल्पाची कल्पना इस्रायलने सुचविली होती. पायाभूत प्रकल्पांमधील प्रावीण्य पाहता यात भारताला सामील करण्यात आले आहे.
बिडेन प्रशासनाने अलिकडेच सौदी अरेबियाला या प्रकल्पात सामील करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर अन्य देशांनी सहमती दर्शविल्यावर सौदी अरेबियाचा यात समावेश करण्यात आला. तर इस्रायल या प्रकल्पाशी निगडित चर्चांमध्ये सामील राहिला आहे. आगामी काळात इस्रायल देखील या प्रकल्पात सामील होऊ शकतो. तर अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी गुरुवारी वॉशिंग्टनमध्sय एका इन्स्टीट्यूटमध्ये केलेल्या भाषणात या प्रकल्पाचे संकेत दिले होते. माझ्या भाषणाती सर्व मुद्दे विसरू शकता, परंतु आय2यु2 विसरू नका असे त्यांनी म्हटले होते.
भारताला होणारा लाभ
चीन सातत्याने पश्चिम आशियात स्वत:चा प्रभाव वाढवत आहे. चीनच्या नेतृत्वाखाली अलिकडेच सौदी अरेबिया अन् इराण यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे अमेरिकेसोबत भारतही चकित झाला आहे. या करारामुळे पश्चिम आशियातील भारताचे हितसंबंध प्रभावित होऊ शकतात. प्रकल्पाच्या अंतर्गत अरब देशांमधील रेल्वेजाळ्याला सागरी मार्गाशी जोडण्यात आल्यास भारतापर्यंत जलदपो आणि कमी खर्चात कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायू पोहोचणार आहे. या संपर्कयंत्रणेमुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या 80 लाख भारतीयांनाही लाभ होणार आहे. याचबरोबर भारताचे रेल्वेक्षेत्रातील एक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर म्हणून ब्रँडिंग होणार आहे.
संपर्कव्यवस्था पाकिस्तानमुळे प्रभावित
पश्चिमेकडी शेजाऱ्यांसोबतच्या कनेक्टिव्हिटीवर पाकिस्तानमुळे प्रभाव पडल्याचे भारताला वाटते. पाकिस्तानमुळे अन्य देशांसोबत संबंध वृद्धींगत करण्यासाठी अनेक ओव्हरलँड मार्ग बंद झाले आहेत. चाबहार (इराण), बंदर ए अब्बास (इराण), दुक्म (ओमान), जेद्दाह (सौदी अरेबिया) आणि कुवेत सिटीसोबत संपर्क व्यवस्था निर्माण करण्यास म्हणावे तितके यश लाभलेले नाही. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आता नवा रेल्वे प्रकल्प भारताला मदत करणार आहे.