माती मूर्तिकारांच्या मेळाव्यात सुरेश पाठक यांचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
उच्च न्यायालयाच्या pop मूर्ती बंदी आदेशाचे पालन करीत पारंपारीक मूर्तिकारांनी मातीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. मात्र शासनाने आदेश देऊनही संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रत्यक्षात कुठेही पि ओ पि मूर्ती बंदीची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे पारंपारिक मूर्तिकारांच्या मूर्ती न विकल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पर्यायाने शासनाच्या या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पारंपारिक मूर्तिकारामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका इशारा दाखल करणार. असा इशारा महाराष्ट्र पारंपारीक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाठक यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्हयातील श्री गणेश मूर्तिकार संघ आयोजित मूर्तिकारांच्या माजगाव येथील मेळाव्यात सुरेश पाठक बोलत होते. यावेळी श्री गणेश मूर्तिकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे, मूर्तिकार रंजित मराठे, श्री गणेश मूर्तिकार संघाचे (सिंधुदुर्ग) अध्यक्ष नारायण ऊर्फ सावंत, गजानन बुरबांदे (नागपूर), श्रीकांत कुंभार (कोल्हापूर), अशोक कडू (मुंबई), नारायण राऊत (पनवेल), राजेंद्र जाधव (रत्नागिरी) आदी उपस्थित होते.यावेळी श्री गणेश मूर्तिकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे यांनी पारंपारीक मूर्तिकारांनी कलेचा वसा जोपासण्याबरोबरच व्यावसायीकताही स्विकारावी तरच मातीचा मूर्तिकार या आधुनिक मार्केर्टींग व ट्रेडिंगच्या व्यवस्थेत टिकावं धरणार असल्याचे सांगितले. तर मूर्तिकार रंजित मराठे यांनी मूर्तिकारांनी नवीन बदल स्वीकारून आपला व्यवसाय वाढविण्याचे आवाहन केले.
यावेळी मेळाव्याचे आयोजक तथा श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेळाव्यात घेतलेल्या निर्णयाची माहिती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यस्तरावरील संघटनेच्या मूर्तिकार प्रतिनिधीना देऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवर न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासाठी राज्यस्तरीय अभियान सुरु करण्याचे आव्हान केले.यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई येथील मूर्तीकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्याचे नियोजन अजय परब, बाळा सावंत, उदय राऊत आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू सावंत यांनी सुत्रसंचालन मनोहर सरमळकर यानी तर उपस्थितांचे आभार सचिव उदय राऊत यांनी मानले.