विटा प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ गलाई व्यावसायिक, नॅशनल गोल्ड अॅण्ड सिल्व्हर रिफायनर्स अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन तथा शिवप्रताप उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रतापशेठ महादेव साळुंखे तथा प्रतापदादा (८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ, तीन बहीणी असा मोठा परिवार आहे. भारतभर विखुरलेल्या गलाई व्यवसायिकांचे मार्गदर्शक आणि मोठा आधार हरपला, अशी भावना व्यक्त होत आहे.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रतापदादांनी खडतर वाटचाल केली. मोठी स्वप्ने पाहिली आणि ती कष्टातून साकार केली. अनेकांना गलाई व्यवसायात मार्गदर्शन केले, स्वतःच्या पायावर उभा केले. नेसत्या कपड्यानिशी राज्याबाहेर गेलेले लोक गलाई व्यवसायात कष्टाने कोट्यधीश झाले. मात्र त्यांनी प्रतापदादांचे ऋण कायम लक्षात ठेवले. भारतभर विखुरलेल्या गलाई व्यवसायिकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रकृतीची पर्वा न करता देशभर दौरे केले. जे योग्य आहे, त्याला योग्य आणि चुकीला चुक म्हणण्याचा स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे होता. म्हणूनच गलाई व्यवसायातील भिष्माचार्य अशी त्यांची ओळख कष्टातून निर्माण झाली होती.
प्रतापदादा साळुंखे यांचे मुळगाव खानापूर तालुक्यातील पारे. नुकतीच या गावची यात्रा झाली. गेल्या ५०-६० वर्षात पहिल्यांदाच असे घडले असेल, की ते यात्रेत सहभागी नव्हते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील देशभरातील गलाई बांधवांची मोठी हानी झाली आहे.
प्रतापदादा यांना वयाच्या ११ व्या वर्षी घरची आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि केरळ मधील आलेप्पी या शहरात सोने गलाईच्या कामासाठी जावे लागले. तिथे अक्षरश: नारळाच्या झावळ्या आणि केळीच्या खुंटांपासून तयार केलेल्या आडोशावर सोने गाळण्याची भट्टी सुरू केली. तिथून सुरू झालेला त्यांचा गेल्या ७० वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे. बघता बघता अवघा केरळ आणि देशभरातील गलाई व्यवसायिकांच्या मनावर त्यांनी साम्राज्य केले. अत्यंत लाघवी स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, दूरदृष्टी आणि प्रेमळ व्यक्तीमत्वाने त्यांनी केरळ बरोबरच दुष्काळी भागात आपल्या व्यक्तीमत्त्वाची छाप उमटवली.