खरेदी दरात दिडशे टक्के वाढ : फोंडा तालुक्यात 500 हेक्टरहून अधिक जागेत भाजी लागवड
प्रतिनिधी /फोंडा
तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी भाजी मिळवण्यासाठी नागरिकांना जी वणवण करावी लागली, त्यातून गोवेकरांमध्ये भाजी लागवडीचे गांभीर्य वाढले आहे. अगदी छोटय़ाप्रमाणात का होईना, पण आपल्या कुटुंबापुरती भाजी लागवड करण्याचा लोकांचा कल वाढला. लॉकडाऊनमध्ये दैनंदिन आहाराचा भाग असलेली भाजी मिळविताना झालेले हाल, तसेच घरबसल्या वेळ घालविण्याच्या उद्देशाने बऱयाचजणांनी आपल्या गच्चीवर, परसबागेत किंवा छोटय़ाशा शेतजमिनीत भाजी लागवड सुरु केली. नागरिकांचा हाच उत्साह पाहून कृषी खात्याने भाजी लागवडीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
फोंडा विभागीय कृषी कार्यालयातून कोरोनाच्या पहिल्या दोन वर्षात 37 किलो भाजीचे बियाणे लोकांनी हातोहाथ नेले. त्यामध्ये शेतकरी तर होतेच, पण आपल्या घरापुरती भाजी पिकवू पाहणारेही बरेच होते. नागरिकांचा भाजी लागवडीतील हा उत्साह व कल पाहून या वर्षीपासून कृषी खात्याने भाजी उत्पादनावर दीडशे टक्के खरेदी दर जाहीर केला आहे. त्यासाठी कृषीकार्डधारक शेतकरीच हवा, ही अट सक्तीची नाही. भाजी लावण्यास इच्छुक असलेला कुठलाही नागरिक अधिकृत नोंदणी करुन या योजनेचा लाभ घेऊ शकतो. वांगी, भेंडी, चिटकीमिटकी, हिरवी मिरची, गावठी टॉमेटो, डब्बू मिरची, दोडकी, दूधी भोपळा, निरफणस, शेवग्याच्या शेंगा यासह तब्बल 25 विविध भाज्यांसाठी हा नवीन खरेदी दर जाहीर केला आहे. सध्या फोंडा कृषी विभागीय कार्यालयात त्यासाठी नोंदणी सुरु आहे. राज्य सरकारच्या फलोत्पादन महामंडळातर्फे स्थानिक शेतकऱयांनी पिकविलेली ही भाजी खरेदी केली जाणार आहे. एखादा शेतकरी स्वतः पिकवलेली भाजी आपल्या मर्जीनुसार खुल्या बाजारात विकू शकतो. स्थानिक शेतकऱयांनी पिकवलेल्या भाज्यांना योग्य दर व बाजार उपलब्ध व्हावा हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे.
पूर्वीचे व सध्याचे नवीन खरेदी दर पाहिल्यास पूर्वी स्थानिक शेतकऱयांकडून 20 रुपयात खरेदी केली जाणारी भेंडी आता 50 रुपये प्रतिकिलो या प्रमाणे खरेदी होणार आहे. चिटकी रु. 22 ऐवजी रु. 51 तर रु. 25 ते रु. 30 प्रति किलोप्रमाणे खरेदी केल्या जाणाऱया हिरव्या मिरचीला रु. 42 असा नवीन दर मिळणार आहे. अन्य इतर भाज्यांनाही जुन्या दरांपेक्षा दीडशे टक्के अधिक भाव मिळणार आहे.
फोंडा तालुक्यात 500 हेक्टर जागेत भाजी लागवड
फोंडा तालुक्यात कोरोनानंतर गेल्या दोन वर्षांत किमान 500 हेक्टरहून जास्त जमीन भाजी लागवडीखाली आल्याची माहिती सध्या फोंडा विभागीय कृषी कार्यालयाचा ताबा असलेले धारबांदोडय़ाचे अधिकारी नागेश कोमरपंत यांनी सांगितले. फर्मागुडी, प्रियोळ, बांदोडा, वेलिंग, शिरोडा, बेतोडा व अन्य भागातील शेतकरी आता भाजी लागवडीकडे वळू लागल्याचे साहाय्यक कृषी अधिकारी ओंकार देसाई यांनी सांगितले. याशिवाय एखाद्या शेतकऱयाचे नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास प्रति हेक्टर रु. 40 हजार याप्रमाणे नुकसान भरपाईची तरतूद आहे. मात्र कृषीकार्डधारक शेतकऱयालाच त्याचा लाभ मिळू शकतो.