समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार, नेत्रावळी पंचायतीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी /सांगे
नेत्रावळी पंचायत क्षेत्राचा पर्यटनदृष्टय़ा विकास करणार असून या पंचायत क्षेत्रात जमीन उपलब्ध झाल्यास जनावरांसाठीचे इस्पितळ उभारण्यात येणार, अशी माहिती सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी नेत्रावळी पंचायत इमारतीचे उद्घाटन करताना दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच रजनी गावकर, अटल ग्रामचे सुभाष वेळीप, माजी पंच प्रकाश भगत, संतोष नाईक व विठ्ठल गावकर, आंतोनेता मास्कारेन्हस, पंचायत सचिव श्रीरंग अग्रासनी व इतर मान्यवर हजर होते. पुढे बोलताना फळदेसाई म्हणाले की, साळावली धरणाच्या पायथ्याशी साकारलेल्या बोटॅनिकल गार्डनचा म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. या विस्तारित कामाची पायाभरणी नजीकच्या काळात करण्यात येणार आहे.
पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याने पंचायत इमारतीचे उद्घाटन करता येते का, या प्रश्नाला उत्तर देताना फळदेसाई म्हणाले की, ही नवीन पंचायत इमारत बांधून पाच वर्षे उलटली आहेत, पण उद्घाटनाला या ना त्या कारणाने मुहूर्त मिळत नव्हता. पंचायतीचा कारभार जुन्या वास्तूत व छोटय़ा खोलीमध्ये चालत होता. जुन्या पंचायत वास्तूला पावसाळ्यात गळती लागत असल्याने पंचायतीमध्ये असलेल्या फायली भिजत होत्या व नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत होता. आता जर या पंचायत इमारतीचे उद्घाटन झाले नसते, तर सहा महिने विलंब झाला असता. म्हणून उद्घाटन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंचायतीबाहेर जे पेव्हर्स बसविण्यात आले आहेत ते तात्पुरते नागरिकांना पावसाळ्यात त्रास होऊ नयेत म्हणून बसविण्यात आले आहेत. ते सर्व स्वतःच्या खर्चाने बसविले आहेत. दीड महिन्यानंतर हे पेव्हर्स काढून नवीन बसविण्यात येणार आहेत, असे फळदेसाई म्हणाले. विधानसभा निवडणुकीत केवळ दिडशे मते पडलेल्यांनी आपल्याला प्रश्न करू नयेत, असेही ते म्हणाले. स्वागत व सूत्रसंचालन रजनी गावकर यांनी केले, तर आभार अग्रासनी यांनी मानले.