कारवाईसाठी गेलेल्या न्यायालयाच्या बेलीप-साखर कारखाना कर्मचाऱ्यांत हुज्जत
खानापूर : येथील भाग्यलक्ष्मी (लैला) साखर कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी खानापूर वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशानुसार येथील श्री भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे कर्मचारी व न्यायालयाचे बेलीप कारखाना कार्यस्थळावर गेले असता त्यांनी साखर गोदामे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला असता तेथे उपस्थित लैला साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी आलेल्या बेलीप व पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना अडवून धरले व त्यांच्याशी हुज्जत घातली. कारवाई करण्यास अडथळा निर्माण करून परत पाठविले. यावेळी भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे सेक्रेटरी भाऊराव चव्हाण, कर्मचारी शरद पारकर व न्यायालयाचे बेलीप उपस्थित होते. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालून अडथळा केल्याने आजची कारवाई थांबवावी लागली आहे. मात्र येत्या दोन दिवसात पोलीस संरक्षण घेऊन जप्तीची कारवाई पूर्ण करू, असे भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे सेक्रेटरी भाऊराव चव्हाण म्हणाले. याबाबतची माहिती अशी की, भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्यासाठी तत्कालीन राजकीय नेत्यांनी व साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मध्यस्थीनुसार भाग्यलक्ष्मी पतसंस्थेने 2005 साली 3 कोटी 16 लाख रु. चे कॉल डिपॉझिट कर्ज दिले होते. मात्र त्याची वसुलीच झालेली नव्हती. मात्र मुद्दल आणि व्याज म्हणून 6 कोटी 29 लाख 63 हजार 638 रुपये इतके थकीत कर्जवसुलीसाठी खानापूर वरिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानुसार खानापूर न्यायालयाने भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याच्या नावे, जप्तीचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर गेले होते. याबाबत कार्यकारी संचालकांना विचारले असता, सदर आदेश हा भाग्यलक्ष्मी साखर कारखान्याच्या नावे आहे. कारखाना भाडेतत्त्वावर घेताना लैला साखर कारखाना या नावे घेतला आहे. आमचा व्यवहार लैला साखर कारखान्याच्या नावे सुरू आहे. त्यामुळे हा आदेश आम्हाला बंधनकारक नाही. भाग्यलक्ष्मी कारखान्याचे कार्यालय अद्याप अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी कारवाई करावी, असे ते म्हणाले.