70 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक : दररोज दीड फूट पाणी उपसा
बेळगाव : शहर आणि उपनगरात पाणी समस्या तीव्र बनली आहे. शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने महापौर आणि उपमहापौरांनी राकसकोप जलाशयाला भेट दिली. शुक्रवारी सकाळी दिलेल्या भेटीप्रसंगी अधिकाऱ्यांकडून पाणीसाठ्याची माहिती घेतली. मे अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहराच्या काही भागात 10 ते 15 दिवस पाणीपुरवठा होत नाही. परिणामी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाण्यासंदर्भातील तक्रारी वाढल्या असून पाणीसमस्या निर्माण होण्यास कारणीभूत कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. एलअॅण्डटीकडून पाणीपुरवठा सुरळीत केला जात नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. महापौर-उपमहापौरांकडे पाण्यासाठी असंख्य तक्रारी होत आहेत. त्यामुळे महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी राकसकोप जलाशयाला भेट दिली. यावेळी राकसकोप जलाशयाची पाहणी करून पाणीसाठ्याबाबतची माहिती जाणून घेतली. राकसकोप जलाशयात सध्या 2461 फूट पाणीसाठा असल्याची माहिती साहाय्यक अभियंते मंजुनाथ यांनी दिली. मागीलवर्षी 2465 फूट पाणीसाठा होता. मात्र मागील वर्षापेक्षा यावर्षी चार फूट पाणीसाठा कमी आहे. तसेच हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने राकसकोप जलाशयातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या असलेला पाणीसाठा 70 दिवस पुरेल, म्हणजेच मे अखेरपर्यंत हा पाणीसाठा पूरण्याची शक्यता आहे. दररोज दीड फूट पाणी उपसा केला जातो. जर पाणीसाठा संपुष्टात आल्यास डेड स्टोअरेजमधील पाणीसाठा उपसा करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.