बेळगाव : वैद्यकीय विज्ञानामध्ये नवनवीन संशोधने होत आहेत. त्यामुळे जनतेचा जीव वाचविणे शक्मय होत आहे. अवयव दान तर वैद्यकीय क्षेत्रातील नवल ठरले आहे, अशी माहिती केएलई डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळाचे हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रिचर्ड साल्ढाणा यांनी दिली.
अवयव दानासंबंधी जागृतीसाठी डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्र, चेन्नई येथील मोहन फाऊंडेशन व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या समारंभात बोलताना डॉ. रिचर्ड यांनी वरील माहिती दिली.
आजमितीला अवयव दानाची भरपूर गरज आहे. मात्र, या प्रक्रियेने म्हणावा तसा वेग धारण केलेला नाही. अनेक देशात स्वयंप्रेरणेने अवयव दानासाठी लोक पुढे येत आहेत. आपल्या देशातही स्वयंप्रेरणेने अवयव दानासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, यासाठी सेवाभावी संस्थांनी जागृती करावी. मृत्यूनंतरच्या अवयव दानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. एका व्यक्तीने केलेल्या अवयव दानामुळे आठ जणांना जगवता येते, असेही डॉ. रिचर्ड यांनी सांगितले.
क्रीडापटू मयुरा शिवलकर यांनी रॅलीला चालना दिली. यासाठी केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांचे सहकार्य लाभले. डॉ. महांतेश रामण्णावर, विजय मोरे, अभिमन्यू डागा, वाहतूक पोलीस अधिकारी बसवराज डोणी, शंकर परसन्नवर, प्रमोद सुळ्ळीकेरी, विनोद देशनूर, शीतल मुंदडा आदींसह अनेकांनी या रॅलीत भाग घेतला होता. सायकलपटू, स्केटिंगपटू रॅलीत सहभागी झाले होते. आरपीडी सर्कलपासून रॅलीला सुरुवात झाली. केएलई इस्पितळात सांगता झाली.