उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना काही केल्या विराम मिळायला तयार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे. काका शरद पवारांशी फारकत घेऊन अजिदादांनी भाजपाशी घरोबा करीत पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळविले खरे. किंबहुना, आपला नेता मुख्यमंत्रीच झाला पाहिजे, अशी आस दादा समर्थक बाळगून आहेत. त्यामुळे अधूनमधून या समर्थकांमार्फत दादा मुख्यमंत्री होतील, असा पुकारा केला जातो नि चर्चेला तोंड फुटून त्याभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत राहते. अलीकडे असा सगळा माहौल तयार झाल्यानंतर दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनाच त्यावर भाष्य करणे भाग पडले. सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. तर अजितदादा पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री होतील, असे फडणवीस यांनी सांगून टाकले. दोन वाक्यात शिंदे गट व दादा गटास कसे चुचकारावे, याचे भाजपाची रणनीती हे आदर्श उदाहरण ठरावे. यातून शिंदे यांना अभय मिळाल्याने ते निश्चिंत राहतात. तर अजितदादांना आम्ही एक-दीड वर्षे नाही, तर पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री करणार, या ग्वाहीमुळे तेही प्रचंड आशावादी राहण्याच्या दृष्टीकोनातून वातावरणनिर्मिती होते. किंबहुना, शरद पवार यांना मात्र हे मुख्यमंत्रिपद हे स्वप्नच राहील, असे वाटते. त्यामुळे दादा केवळ उपमुख्यमंत्रीच राहणार काय, असा सवाल आपसूक निर्माण होतो. मागच्या काही वर्षांतील महाराष्ट्राचे राजकारण पाहिले, तर उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादा हे समीकरणच निर्माण झाले आहे. सत्तेवर कुणीही असो. इकडचे वा तिकडचे. उपमुख्यमंत्रिपदी दादाच. एकप्रकारे दादांची राजकारणाची ही मर्यादाच म्हणता येईल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व फूट घडवून आणली. उद्याच्या राजकारणात ते, त्यांचा गट टिकेल अथवा नाही. परंतु, स्वत:च्या नावापुढे मुख्यमंत्रिपदाची पाटी लावण्यात ते यशस्वी ठरले. दादांना अजून तेही साधता आलेले नाही. 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. म्हणजे या निवडणुकीसाठी काहीच महिने राहिले आहेत. इतक्या कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री बदल होण्याची सूतराम शक्यता नाही. कुणी काही वल्गना करो. मात्र, भाजपा, शिंदे गट व दादा गट आणि काँग्रेस, उद्धव सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील लढत कडवी असेल. केंद्रात सत्ता असली, तरी महाराष्ट्रातील सत्ता टिकविणे, महायुतीकरिता सोपे नसेल. उद्या महाविकास आघाडी सत्तेवर आली, तरी आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. तसे झाले, तर अजितदादांना मुख्यमंत्री होता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असेल. समजा महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या, तरी अजितदादांकडे राज्याच्या नेतृत्वाची कमान दिली जाईल, असे म्हणणेही धाडसाचे ठरेल. आधी शिंदेंकडे मुख्यमंत्रिपद, त्यानंतर अजितदादांकडे मुख्यमंत्रिपद, असाच खेळ भाजपा खेळत राहिला, तर त्यांच्या पक्षाचे काय होणार, हा मूळ प्रश्न आहे. हे पाहता वारंवार भाजपावाले मनावर दगड ठेवतील किंवा त्यागाची भूमिका घेतील, असे वाटत नाही. त्या अर्थी शरद पवार म्हणतात ते योग्यच. वास्तविक, पवार यांनी ठरविले असते, तर अजितदादा कधीच मुख्यमंत्री झाले असते. तसे पाहिले, तर 2004 मध्ये राष्ट्रवादीला तशी सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. स्वाभाविकच राज्यात प्रथमच आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करणे, पवारांना सहजशक्य होते. मात्र, त्याऐवजी अधिकची मंत्रिपदे मिळविण्यास पवारांच्या पक्षाने धन्यता मानली. परिणामी प्रमुख पक्ष ठरूनही राष्ट्रवादीला नमते घ्यावे लागले. तर दोन गुण कमी मिळवूनही काँग्रेसला आपले वर्चस्व कायम ठेवता आले. ही तशी राजकीय चूकच. अजितदादांनी अलीकडे वारंवार त्याचा उच्चार केल्याचे आपण ऐकले आहे. अर्थात शरदरावांनी तसे म्हटल्याचे ऐकिवात नाही. यातून मग हीदेखील पवारांची खेळी होती का, असा प्रश्न निर्माण होतो. पवार हे धूर्त व मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. पुलोदचा प्रयोग करीत पवारांनी सत्तेचे सिंहासन कसे मिळविले, हे उभा महाराष्ट्र जाणतो. तेच पवार काँग्रेसबाबत इतके उदार का झाले असावेत? या मागे अजितदादांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्याचा तर त्यांचा मानस नसावा ना, असा सवाल उत्पन्न होत असेल, तर तो गैरलागू ठरू नये. तेव्हाचा अजितदादांचा खडूस स्वभाव, फटकळपणा, उद्धटपणा या गोष्टीही त्याला कारणीभूत असू शकतात. किंवा सहसा पुतण्याबद्दल कोणत्याही काकास हमी वाटत नाही. यांना मुख्यमंत्री केले, तर उद्या हेच आपल्यावर दादागिरी करतील, अशीही भीती असू शकते. काही असो. अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न हे स्वप्नच राहील, हे वाक्य बोचणारे होय. म्हटले, तर यात खिल्ली उडविणे आहे, थट्टा आहे नि कुत्सितपणाही आहे. आपला पुतण्या या पदास पात्र आहे वा नाही, यावर काकांनी भाष्य केलेले नाही. तरीही त्यांनी अजितदादांना यातून वास्तवाची जाणीव करून देण्याचाही प्रयत्न केला आहे. 8 ते 10 जागा मिळवून पंतप्रधान होता येत नाही, याचा अनुभव स्वत: पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर अजितदादांनाही भविष्यात तेवढ्या जागा खेचाव्या लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला, तर आज कोणताही एक पक्ष बहुमताच्या जवळ जाईल, अशी स्थिती नाही. दोन शकले झाल्यामुळे सेना व राष्ट्रवादीचा शक्तीक्षय होणार, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नातून बाहेर पडत दादा समर्थकांना सत्याशी भिडावेच लागेल. कार्यक्षमता, प्रशासनावरील पकड, दमदारपणा, वक्तशीरपणा यामुळे दादांना मानणाराही एक वर्ग निश्चित आहे. तरीही दादा हे महाराष्ट्रातील सर्वप्रिय वा प्रभावी राजकारणी आहेत, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. उलटपक्षी त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे अधिक लोकप्रिय व प्रभावशाली ठरतात. या साऱ्याचा विचार करता काका म्हणतात त्याप्रमाणे दादा व त्यांच्या समर्थकांना वास्तवाची जाणीव ठेवावी लागेल. फुटून बाहेर पडण्याइतके निवडून येणे सोपे नसते. महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना लवकरच याचा अनुभव येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याच लोकप्रतिनिधीने कसल्या स्वप्नात राहू नये.
Previous Articleरंग….तरंग 2
Next Article चंद्राबाबू नायडू यांना अंतरिम जामीन मंजूर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.