राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गाच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी गांधीनगर येथील सर्व्हिस रस्त्याच्या शेजारी साईडपट्ट्यांची माती वाहुन गेल्याने हा रस्ता वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहे. याकडे प्राधिकरण मंडळ लक्ष देईल का? अशी विचारणा वाहनधारक करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी प्राधिकारण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता कोट्यावधीचा निधी खर्च केला जात आहे. पण राष्ट्रीय महामार्ग वगळता सर्व्हिस रस्त्याच्या देखभालीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामागार्माशेजारील सर्व्हिस रस्ते धोकादायक बनले आहेत. गांधीनगरहून सांबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील माती पावसाळ्यात वाहून गेली आहे. अशाप्रकारे ठिकठिकाणी बाजुपट्ट्या वाहून गेल्याने चरी निर्माण झाल्या आहेत. दुचाकी तसेच लहान वाहनधारकांना खूपच धोकादायक बनले आहे. हा सर्व्हिस रस्ता खूपच अरूंद आहे. समोरून येणारे एखादे वाहन ओव्हरटेक करीत असल्यास जाणाऱ्या वाहनधारकांना रस्त्याशेजारी थांबावे लागते. बाजुला थांबलेल्या वाहनधारकाने डांबरी रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करताना चरींमुळे वाहने घसरत आहेत. काहीवेळा या ठिकाणी अपघात घडत आहेत. विशेषत: या चरींचा फटका दुचाकी वाहनधारकांना अधिक बसत आहे.
गांधीनगर रेल्वे ट्रॅकवरील पुलापासून मारुतीनगरपर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याच्या बाजुपट्ट्या पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. त्यामुळे सर्वच वाहनांचे अपघात घडत आहेत. या बाजुपट्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे आहे. मात्र प्राधिकरण मंडळाकडून केवळ राष्ट्रीय महामार्गाची देखभाल करण्यावर भर दिली जाते. मात्र या रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महापालिकेकडूनही बाजुपट्ट्यांची दुरूस्ती केली जात नसल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे.