महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विवदास्पद वक्तव्य केल्यामुळे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे वादामध्ये अडकले आहेत. भिडे यांच्या या वक्तव्याचे पडसाड विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्येही उटलेले आहे. काँग्रेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर आज स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरवात झाली असून सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
विधानसभेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनी उचलून धरल्यावर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं, ते म्हणाले, “कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणालाही अपशब्द काढण्याची परवानगी नाही. तसे जर कोण करत असेल तर त्यांच्यावर राज्यसरकार नक्कीच कारवाई करेल. संभाजी भिडे जर यांनी खरोखर अशा पद्धतीचं वक्तव्य केले असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच वि. दा. सावरकर यांचीही मानहानी करणाऱ्यावर कारवाई केली जाणार.” असा त्यांनी इशारा दिला.
“अमरावतीतल्या भाषणाप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे गुरुजींना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना पाठवण्यात आलेली नोटीस संभाजी भिडे यांनी स्वीकारली असून त्याप्रकरणी त्यांची चौकशी लवकरच सुरु होईल.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “संभाजी भिडे अमरावतीमध्ये जे काही बोलले त्या सभेचा व्हिडीओ उपलब्ध नाही. सोशल मीडीयावर जो व्हिडीओ फिरत आहेत, त्याचे व्हॉईस सॅम्पल्स तपासले जातील आणि त्यानंतरच याप्रकरणी कारवाई होईल.” असाही त्यांनी स्पष्टीकरण दिले.