दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास ः पाकिस्तानचे माजी लष्करी हुकुमशहा
वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती तसेच माजी लष्करी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 79 वर्षांचे हेत. मुशर्रफ दीर्घकाळापासून अमाइलॉइडोसिस या आजाराने ग्रस्त होते आणि दुबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सैन्यप्रमुख असताना परवेझ मुशर्रफ यांनीच कारगिलमध्ये घुसखोरी घडवून आणत भारताच्या विरोधात युद्ध सुरु केले होते. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली होती. मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तानात अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.
मुशर्रफ हे 20 जून 2001 ते 18 ऑगस्ट 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. मे 2016 मध्ये पाकिस्तानच्या न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी मुशर्रफ यांना फरार घोषित केले होते. मुशर्रफ मागील अनेक महिन्यांपासून रुग्णालयात दाखल होते. अमाइलॉइडोसिस आजारामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. या आजारात मानवी शरीरात अमाइलॉइड नावाचे असामान्य प्रोटीन निर्माण होऊ लागते, हे प्रोटीन हृदय, मूत्रपिंड, यकृत, नर्व्हस सिस्टीम, मेंदूत जमा होऊ लागते, यामुळे या अवयवांमधील पेशी योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत.
कारगिलचा कट रचणारा सैन्यप्रमुख
परवेझ यांनी वयाच्या 21 व्या वर्षी पाकिस्तानी सैन्यात प्रवेश केला होता. 1965 च्या युद्धात त्यांनी भारताच्या विरोधात लढा दिला होता, त्या युद्धातही पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला होता. तरीही पाक सरकारकडून मुशर्रफ यांना पदकाने गौरविण्यात आले होते. 1998 मध्ये मुशर्रफ हे पाकिस्तानचे सैन्यप्रमुख झाले होते. सैन्यप्रमुखपदी असताना त्यांनी भारताच्या विरोधात युद्धाचा कट रचला होता. परंतु मुशर्रफ यांचे मनसुबे भारतीय सैन्याने उधळून लावले होते. कारगिलवर कब्जा करण्याची शपथ मी घेतली होती, परंतु नवाज शरीफ यांच्यामुळे हे करता आले नसल्याचे मुशर्रफ यांनी स्वतःचे आत्मचरित्र ‘इन द लाइन ऑफ फायर-अ मेमॉयर’मध्ये नमूद केले आहे.
शरीफ यांचा विश्वासघात
1998 मध्ये तत्कालीन पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुशर्रफ यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना सैन्यप्रमुखपदी नियुक्त केले होते, परंतु एक वर्षानतंरच 1999 मध्ये जनरल मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांना सत्तेवरून हटवत स्वतः पाकिस्तानचे हुकुमशहा झाले होते. यानंतर नवाज शरीफ यांना कुटुंबासमवेत पाकिस्तानातून पलायन करावे लागले होते. मुशर्रफ यांच्यावर बलूच समुदायावर अत्याचार करविल्याचा आरोप आहे.
स्वतःवरही देश सोडण्याची वेळ
3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी आणि मग मार्शल लॉची घोषणा केल्याप्रकरणी 2013 मध्ये मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालला, यानंतर नवाज शरीफ सरकारने एप्रिल 2013 मध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती, तरीही मुशर्रफ यांनी 18 मार्च 2016 रोजी पाकिस्तान सोडले होते. प्रकृती अस्वास्थामुळे देश सोडल्याचा दावा त्यांनी केला होता.
मूळचे दिल्लीचे कुटुंब
परवेझ मुशर्रफ यांचे कुटुंब फाळणीपूर्वी भारतातील अत्यंत सधन कुटुंब होते. त्यांचे आजोबा टॅक्स कलेक्टर म्हणून कार्यरत होते. तर वडिल ब्रिटिश राजवटीत शासकीय अधिकारी होते. मुशर्रफ यांच्या कुटुंबाचा दिल्लीत एक मोठा वाडा होता. वयाच्या 4 वर्षापर्यंत मुशर्रफ येथेच राहिले होते.