पाणी संकट गडद, काटकसरीची गरज : पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता : सर्वांचेच डोळे आभाळाकडे
बेळगाव : पावसाने दडी मारुन केवळ जनतेच्याच नाही तर अधिकारी, प्रशासन आणि सरकारच्या तोंडचेही पाणी पळविले आहे. जूनचा पंधरवडा उलटला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दुसरीकडे राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असून डेडस्टॉक उपसण्याची वेळ आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एल अॅण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 5 जुलैपर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे सध्या आभाळाकडे लागून राहिले आहे.
शाळांसमोर पाणी संकट
पाण्याचे संकट दिवसेंदिवस असे गडद होत चालले तर प्रशासनाला गंभीर पावले उचलावी लागणार आहेत. मुख्य म्हणजे शाळा आणि महाविद्यालये यांच्यासमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकणार आहे. सध्या शहरातील एका शाळेने ऑनलाईन वर्ग घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. परंतु शिक्षण खात्याने त्या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. परिणामी या शाळेसमोर पाण्याचा पुरवठा कसा करायचा? हे धर्मसंकट उभे राहिले आहे. तरुण भारत प्रतिनिधींनी शिक्षणाधिकारी, बिम्स् हॉस्पिटलचे संचालक व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या बाबत चर्चा केली. त्यावेळी शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी एकाच शाळेसमोर पाण्याचे संकट नसून सर्व शाळांनाच तो प्रश्न भेडसावू शकतो. त्यामुळे एकाच शाळेसाठी अशी मान्यता देता येणार नाही, हे स्पष्ट केले. बिम्स् प्रशासनासमोर सुध्दा पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. बिम्स् हॉस्पिटल येथे एकूण 1040 खाटा आहेत. मुख्य म्हणजे सध्या रुग्णांची गर्दी असून त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय आहेत. या सर्वांसाठी पाणी उपलब्ध करुन देणे हे बिम्स् समोरचे मोठे आव्हान आहे. बिम्स आणि रुग्णांचा विचार करुन एल अॅण्ड टी कंपनीने शक्यतो बिम्सला पाण्याची अडचण भासू नये यासाठी प्रयत्न केले. परंतु आता मात्र कंपनीने बिम्सला एक नोटीस पाठवून यापुढे तुम्ही सोय करुन घ्या, असे कळविले आहे.
पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता
बिम्सला दररोज सकाळी 8 लाख लीटर व संध्याकाळी किमान 4 लाख लीटर पाण्याची गरज भासते. मात्र सध्या सकाळी 4 लाख लिटर आणि संध्याकाळी 4 लाख लीटर पाणी कंपनीतर्फे बिम्सला पुरविण्यात येत आहे. येत्या काळी दिवसांत यामध्ये सुध्दा पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान बिम्स परिसरात ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे. त्याला सुध्दा पाण्याची आवश्यकता आहे. एकवेळ काम थांबविता येईल. परंतु सध्या बिम्सकडे स्टोरेज टाक्यासुध्दा उपलब्ध नसल्याने अडचण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
दरम्यान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी संपर्क साधून पाण्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देताच त्यांनी त्वरित दखल घेतली. आपण खानापूरला आहोत. मात्र याबाबत त्वरित अधिकाऱ्यांना सूचना करु, अशी ग्वाही दिली व त्वरीत ऑनलाईनद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली व नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यासाठी त्वरित पावले उचलण्याची सूचना केली. पाण्याच्या समस्येबाबत बेळगाव उत्तरचे आमदार राजू उर्फ आसीफ सेठ यांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्त रुद्रेश घाळी व एल अॅण्ड टीचे अधिकारी यांच्या समवेतही चर्चा केली.
शाळांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करा
कॅम्पमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वर्ग घेण्याची परवानगी मागितली होती. परंतु एका शाळेसाठी अशी परवानगी देता येत नाही. कॅम्प परिसरात अनेक शाळा आहेत. या शाळांनी सध्या तरी पर्यायी व्यवस्था निर्माण करुन पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आणि पाऊस असाच लांबत राहिला तर प्रशासनाबरोबर चर्चा करुन मगच निर्णय घेतला जाईल.
बसवराज नलतवाड-जिल्हा शिक्षणाधिकारी
पाणी कपात करावी लागणार
बिम्सला दररोज सकाळी 8 लाख व संध्याकाळी 4 लाख पाण्याची गरज आहे. एल अॅण्ड टी ने आतापर्यंत आम्हाला बरेच सहकार्य केले व पाणी उपलब्ध करुन दिले. मात्र आता कंपनीचा सुध्दा नाईलाज झाला असून पाणी कपात करावी लागणार असे कंपनीने स्पष्ट केले आहे. रुग्णांसाठी पाणी उपलब्ध करुन देणे हे आमचे अर्तव्य आहे. मात्र पावसाने जर असाच हात दिला तर मात्र वसतीगृहे आणि कॉलेजला मात्र सुट्टी देणे भाग आहे. शक्यतो तशी वेळ येवू नये यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
डॉ. अशोक कुमार शेट्टी-संचालक बिम्स
ऑनलाईन मिटींग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना सूचना
जी शाळा ऑनलाईन वर्ग घेण्याची मागणी करत आहे ती शाळा कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये येते. कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी या शाळांना पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. शाळांनी सुध्दा पाणी उपलब्ध होण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टींगसारखे उपक्रम हाती घेणे गरजेचे होते. पाण्याचे संकट गडद होत असताना सोमवारी ऑनलाईन मिटींग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींसह ग्राम पंचायत स्तरापर्यंत सर्वांनी आता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होणार आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील
हिडकल जलाशयातील पाणी उपसा करण्याची सूचना
बैठकीमध्ये हिडकल जलाशयातील पाणी उपसा करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार 7 मिलीयन लीटर पाणी उपसा केला जाईल. यापूर्वी हुक्केरी जिल्हा पंचायतीच्या कक्षेमध्ये पंप होते. त्याची दुरुस्ती करुन आता त्याद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. या शिवाय नवीन पंप बसविण्यासाठी ट्रॉन्स्फॉर्मर उभा करणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागेल.
– हार्दिक देसाई एल अॅण्ड टी कंपनी सरव्यवस्थापक