कोरगाव पंचायत ग्रामसभा झाली वादळी, विविध विषयांवर झालेल्या चर्चेत पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी धरले धारेवर
पेडणे : कोरगाव पंचायत ग्रामसभा वादळी झाली. विविध विषयांवर झालेल्या चर्चेत सरपंच आणि पंचायत मंडळाला ग्रामस्थांनी धारेवर धरले. ग्रामस्थांनी पेडणे हा राखीव मतदारसंघ असल्याने या भागाचे निवडून आलेले आमदार प्रवीण आर्लेकर यांना सरकारने मंत्रीपद द्यावे अशी जोरदार मागणी केली व तसा ठराव मांडला. पेडण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पावर सरकारने पेडणेतील बेरोजगार युवकांना नोकऱ्या द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली. यावेळी विविध विषयावर झालेल्या चर्चेत ग्रामस्थ आक्रमक बनले. पंचायत मंडळ सरपंच तसेच ग्रामस्थांच्या यांच्या शाब्दीक चकमक अनेकवेळा झाली. ग्रामस्थ अनेकवेळा सभेच्या व्यासपीठाकडे धावून गेल्याचे पहावयास मिळाले. सरपंच समीर भाटलेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपसरपंच कल्पीता कलशांवकर, पंच देविदास नागवेकर, पंच अब्दुल नाईक, अनुराधा कोरगाकर, उमेश च्यारी, पंच तृप्ती नरसे, दिवाकर जाधव, लौकीक शेट्यो, सचिव श्रद्धा कोरगावकर यावेळी उपस्थित होते. यावेळी व्यंकटेश घोडगे यांनी पेडणे हा मतदारसंघ खुला करावा अशी मागणी करणारी सूचना केली. यावेळी राजू नरसे यांनी या मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर हे राखीव मतदारासंघातून निवडून आलेले आहेत. सरकारने आतापर्यंत आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना मंत्रिपदे दिली. या भागात आता निवडून आलेले प्रवीण आर्लेकर यांना सरकारने मंत्रीपद द्यावे अशी जोरदार मागणी केली.
कचरा प्रकल्पावर चर्चा
ग्रामसभेत कचरा प्रकल्प यावर बरीच चर्चा झाली. कोरगाव पंचायत क्षेत्रात कचरा मोठ्या प्रमाणात असून हा कचरा साठवून ठेवण्यासाठी योग्य जागा मिळत नसाल्याचे सरपंच समिल भाटलेकर यांनी सांगितले. यावेळी कोरगाव पंचायत क्षेत्रात भालखाजन तसेच अन्य भागात रस्त्या शेजारी कचरा टाकण्यात येतो त्यावर पंचायतीने कारवाई करावी अशी मागणी केली.
सत्तरीच्या व्याघ्र प्रकल्पाच्या समर्थनात ठराव
सत्तरी होणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाला सरकारकाने मान्यता देऊन हा व्याघ्र प्रकल्प करावा असा ठराव ग्रामसभेत सुदीप कोरगावकर यांनी मांडला व तो संमत करण्यात आला. कोरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पांना ग्रामसभेची मान्यता घेवून नंतरच परवानगी द्यावी. तसेच देवसू भोम पठारावर जो नवीन रस्ता डोंगर भागात झाला त्याठिकाणी होणाऱ्या प्रकल्पाला ग्रामसभेची परवानगी घेऊन मान्यता द्यावी अशी मागणी केली. कोनाडी येथील रस्त्याच्या विषयावरही झाली चर्चा. यावेळी सदानंद भगत यांच्या घरापार्यंत रस्ता करण्यासाठी सरकारने मान्यता देऊन आणि काम सुरू कऊनही अजून पर्यंत रस्ता का केला नाही. या प्रभागाचे पंच अब्दुल नाईक हे मानमानी करत असून यापुढे त्याना विकासाकामाना परवानगी देताना ग्रामसभेची मान्यता घ्यावी अशी मागणी राहुल भगत व कोनाडी येथील ग्रामस्थानी केली. भालखाजन येथे नळाला पाणी येत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक बनले. आम्हाला पाणी द्या अशी मागणी यावेळी भालखाजन येथील वाड्यावरील नागरिकानी केली.