याचिका सुनावणीस सर्वोच्च न्यायालय राजी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याचे सरकारला निर्देश देण्याची मागणी करणाऱया याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या मुद्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसून गेल्या 9 वर्षांपासून चालढकल सुरू असल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.
स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली आहे. आम्ही याचिकेवर लवकरच सुनावणी करू, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि जे. बी. परदीवाला यांच्या खंडपीठाने सोमवारी स्पष्ट केले. सांस्कृतिक मंत्रालय रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेवर काम करत असल्याचे यापूर्वी 19 जानेवारी रोजी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले होते. तसेच भारतीय उपग्रहांना रामसेतूच्या उत्पत्तीशी संबंधित कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. भारतीय उपग्रहांनी रामसेतूची उच्च रिझोल्यूशन छायाचित्रे घेऊनही त्यांच्याकडून ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गेल्यावषी 22 डिसेंबर रोजी राज्यसभेत सांगितले होते. आता यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून कशाप्रकारे युक्तिवाद मांडला जातो यावर रामसेतू ‘राष्ट्रीय वारसास्थळ’ होणार की नाही, हे ठरणार आहे.