मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दिल्लीत नारा
प्रतिनिधी /पणजी
गोव्यावर सत्ता गाजवताना सुमारे 450 वर्षांच्या कालखंडात पोर्तुगीजांनी येथील अनेक मंदिरे पाडून हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले. ही मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
नुकत्याच आपल्या दिल्ली भेटीत तेथे आयोजित प्रसार माध्यमांच्या महासंमेलनात विशेष अतिथी म्हणून ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
मंदिरे हा आमचा अनमोल ठेवा
गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेली मंदिरे पुन्हा बांधण्यात काय गैर आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. पर्यटकांच्या दृष्टीने आतापर्यंत गोव्याची ओळख ही ’सन, सेंड, सी’ एवढीच होती. त्यात बदल झाला पाहिजे. गोव्याची खरी ओळख वेगळीच आहे. आमची संस्कृती, परंपरा, धार्मिक चालीरिती, मंदिरे हे सर्वकाही पर्यटकांनी पाहिले पाहिजे. आम्ही ते त्यांना दाखवू इच्छित आहोत. याचाच भाग म्हणजे मंदिरे हा आमचा अनमोल ठेवा आहे. त्यासाठी पोर्तुगिजांनी पाडलेली मंदिरे पुनः प्रस्थापित करण्यात येणार आहेत, असे डॉ. सावंत यांनी पुढे सांगितले.
हिंदू संस्कृतीचे रक्षण महत्वाचे
पोर्तुगीजांनी त्यांच्या राजवटीत असंख्य हिंदूंचे धर्मांतर केले. त्याचबरोबर येथील अनेक भव्य मंदिरे पाडली. हिंदू संस्कृतीच नष्ट करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. हीच मंदिरे आम्ही पुन्हा बांधणार आहोत. हिंदू संस्कृतीचे रक्षण होणे महत्वाचे आहे. म्हणुनच या मंदिरांचे फेरबांधकाम करण्यात गैर काहीच नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी मांडले व या कार्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटींची तरतूद केली असल्याचे सांगितले.
अन्य एका प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी गोवा मुक्तीपासून समान नागरी कायदा अंमलात आणणारे गोवा हे एकमेव राज्य आहे, असे सांगितले. हा कायदा सर्वांच्या कल्याणासाठी योग्य असल्यामुळे अन्य राज्यांनीही आमचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.