डॉ.अभय बंग यांचे परखड मत : साधले यांच्या ‘सृष्टीधर्म’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रतिनिधी /फोंडा
आजचा चंगळवाद व अधिकाधिक गोष्टीचा संचय करण्याची माणसांमधील हाव यामुळेच पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विकासाच्या नावाखाली सध्या जगात जे काही सुरु आहे ते पाहिल्यास सृष्टी संहारासाठी जणू घाईच झालेली दिसते. विज्ञानामुळे जगासमोर आज पर्यावरणीय विनाशाचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावर उपायही विज्ञानाच्याच माध्यमातून शोधावे लागतील. त्यासाठी विज्ञानाची दिशा बदलावी लागेल असे प्रतिपादन प्रसिद्ध समाज कार्यकर्ते व गांधीवादी डॉ. अभय बंग यांनी केले.
ज्येष्ठ पर्यावरणवादी कमलाकर साधले यांनी लिहिलेल्या ‘सृष्टीधर्म’ या पर्यावरण विषयक पुस्तकाच्या प्रकाशन व चर्चासत्राच्या कार्यक्रमात डॉ. बंग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर पत्रकार राजू नायक, लेखक कमलाकर साधले, ललिता जोशी, लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर व पांडुरंग घाटे हे उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्येच सृष्टी संवर्धनाची बिजे रुजली आहेत. महात्मा गांधीच्या पर्यावरणीय विचारात तो द्रष्टेपणा दिसून येतो. गांधींनी लोकांना वैयक्तीक कार्यक्रम देऊन पर्यावरण संवर्धनाचे विलक्षण उपाय सुचविले आहेत. युरोप सारख्या प्रगत राष्ट्रात शंभर वर्षांपूर्वी औद्योगिकरण व त्यातून निर्माण झालेल्या पर्यावरणीय प्रश्नांना गांधीजी सैतानी सभ्यता असे म्हणत. युरोपियन व ब्रिटिशांच्या वृत्तीने आपण जगायला लागलो तर एक पृथ्वी आपल्याला पुरणार नाही. अतिरेकी उपभोग हा सृष्टीला मारक आहे. इतरांच्या श्रमावर जगणे हाच मुळात शाप असून निव्वळ यांत्रिकीकरण नको. आपल्या श्रमातून उत्पादन निर्मिती करणे हा सृष्टीधर्म गांधींजींना अपेक्षीत होता, असे बंग पुढे म्हणाले.
साधले यांचे ‘सृष्टीधर्म’ पुस्तकाचे शिर्षकच मुळात सूचक आहे. वाचकांचे डोळे उघडणारे व पर्यावरणीय समतोलाचा कार्यक्रम देणारे आहे. पर्यावरणाची हानी मुळात कशी होते हे वैज्ञानिक पद्धतीने त्यांनी मांडले आहे. शिवाय त्यावर उपायही सांगितले आहेत. धर्म याचा अर्थ इतरांप्रती आपले कर्तव्य ही मूळ संकल्पनाच त्यांनी मांडली असून त्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे अनेक नवे उपाय सुचविले आहेत. जागृती बरोबरच राजकीय व आर्थिक निती बदलतानाच दुसरीकडे व्यक्तीगत पातळीवर आचरणही ते या पुस्तकातून सांगतात.
कमलाकर साधले यांनी या लेखनामागील प्रेरणा व उद्देश सांगताना माणसाने पृथ्वीच्या व्यवस्थापनात बिघाड केला असून विकासाची संकल्पनाच चुकीच्या पद्धतीने मांडली गेली आहे. सृष्टीतलावर असलेल्या अनेक प्रजाती या मानवी अतिरेकामुळे नष्ट झाल्या. त्या पुन्हा तयार करण्याची कुवत आपल्याकडे नसल्यास त्या नष्ट करण्याचा अधिकारही आपल्याला उरत नाही असे सांगून पर्यावरणाबरोबरच जलप्रदूषण व व्यवस्थापन यावरही पुस्तकात सखोल विश्लेषण केल्याची माहिती त्यांनी दिली. सृष्टी धर्म हे केवळ पुस्तक नसून ती एक विचारधारा आहे असे ललिता जोशी यांनी नमूद केले. पांडुरंग घाटे यांनी निर्मल विश्व या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. नारायण देसाई यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. अनुप प्रियोळकर यांनी स्वागत तर साईली गावकर यांनी सूत्रसंचालन केले.