कविता, साहित्य, नाटय़, सामाजिक क्षेत्रांत भरीव कार्य, 12 रोजी पार्थिवावर अंत्यसंस्कार
प्रतिनिधी /सांगे
सांगेतील प्रसिद्ध कवी, साहित्यिक, नाटय़कलाकार, समाजकार्यकर्ते, राजकीय नेते आणि माजी नगरसेवक डॉ. रेवणसिद्ध रामनाथ नाईक यांचे रविवार 9 रोजी सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. नाईक हे मधुमेह, मूत्रपिंड व नेत्रविकाराने आजारी होते. त्यांच्या अकाली निधनावर सांगे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक अष्टपैलू व अजातशत्रू असे व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेल्याची प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
डॉ. रेवणसिद्ध नाईक यांचा जन्म 20 ऑक्टोबर, 1971 रोजी सांगे येथे झाला. बुधवार 12 रोजी त्यांच्या पार्थिवावर सांगे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी 11 वा. चिरेबांध येथील त्यांच्या निवासस्थानाकडून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्यापश्चात पत्नी सुनयना, भाऊ संजय, अजय, शेखर, शैलेश, भावजया, पुतणी असा परिवार आहे. लहानपणापासून डॉ. नाईक यांना कोकणी नाटक आणि संगीताचे खूप आकर्षण होते. कोकणी गीते-संगीताचे बारीक निरीक्षण करून ते स्वतः गीत रचून तसेच संगीतबद्ध करून सादर करायला लागले. हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात असताना गोंय शाहीर उल्हास बुयांव यांच्या ‘मंगळुराच्या शारात एक चेडूं देखिला’ या गीताच्या धर्तीवर ‘सोबित आमच्या सांग्यार मोगाळ आमचो लोक’ हे गीत रचून त्यांनी सादर केले होते. कवी, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, चांगले वक्ते व कुशल सूत्रसंचालक तसेच संघटक अशी त्यांची ओळख होती.
हल्लीच त्यांना कोकणी भाषा मंडळाचा जुझे पिएदाद क्वाद्रुस स्मृती कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त झाला होता. आपल्याबरोबर अनेक कलाकार त्यांनी घडविले. त्यांच्या लेखनात नक्षत्र पुनवेचें, सृजनफुलां हे दोन कवितासंग्रह तसेच महारथी कर्ण, प्रतिकार, चांडाळ चौकडी बारा भानगडीत, काणी अस्तुरेची, चला नाटक करूया, आवय तुज्या मोगाखातीर अशी नाटके तसेच विनयसिद्धी गौरव ग्रंथ यांचा समावेश होतो. कोकणी मुक्तताय, पिंपळ पेटला, चैतन्याक मठ ना, आत्मवंचना, शबै शबै बहुजन समाज, जैत तसेच मराठी संगीत मत्स्यगंधा, अमृत मोहिनी, मोरुची मावशी, शिवकंकण, इथे ओशाळला मृत्यू आदी नाटकांत डॉ. नाईक यांनी स्वतः मुख्य भूमिका करून ती दिग्दर्शित केली होती.
राजकीय, सामाजिक क्षेत्रांत भरीव कार्य
ते काँग्रेसच्या सांगे गटाचे अध्यक्षही होते. पक्षाच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. काँग्रेसमध्ये असूनही सर्वांशी त्यांचे जवळचे नाते होते. सामाजिक क्षेत्रात राज्य तसेच स्थानिक पातळीवर त्यांनी भरीव कार्य केले. सांगे परिसरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे ते अध्यक्ष होते. जेसीआय, संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुर्गापूजन समिती येथे त्यांनी कौतुकास्पद कार्य केले. त्यांना कविता आणि गायनासाठी अनेक बक्षिसे मिळाली होती. नेहरू युवा केंद्राशी संबंधित बऱयाच संस्थांची त्यांनी अध्यक्षपदे भूषविली. पाच वर्षे सांगे पालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा युवा पुरस्कार, कुडचडे कोकणी केंद्राचा पुरस्कार यासह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आणि अनेक संस्थांकडून त्यांचे सत्कार झाले.
…आणि ते भाषण ठरले शेवटचे
दसऱयाच्या दिवशी सांगेतील श्री पाईकदेवाच्या नूतन मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण शेवटचे ठरले. त्यापूर्वी सांगेच्या संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांचा सन्मान झाला होता. तेथेही त्यांनी भाषण केले होते. आता आपली प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते. तसेच दुर्गापूजन कार्यक्रमातही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा प्रकारे सलग तीन कार्यक्रमांतून सांगेवासियांना डॉ. नाईक यांचे बोल ऐकण्याची संधी प्राप्त झाली होती.
डॉ. रेवणसिद्ध नाईक यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर कणकुंबी येथे सेवा देण्यास सुरुवात केली. त्यांनी कष्टी, काले येथील अपरान्त आयर्न अँड स्टील प्लांट येथेही डॉक्टर म्हणून सेवा दिली. ‘आपण त्यांना 1990 पासून ओळखतो. जेसीआयसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असे आहे. कोकणी साहित्यासाठी डॉ. नाईक यांनी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या मुखात नाही हा शब्द नव्हता. समाज त्यांना विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने सांगेवासियांसह संपूर्ण गोव्याचे नुकसान झाले आहे’, अशी प्रतिक्रिया ऍड. आल्प्रेड फर्नांडिस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.