बुरुज ढासळू लागले, पायवाटेच्या कडाही कोसळू लागल्या, किल्ल्याच्या भिंतीजवळ मोठमोठे ख•s
काणकोण : पोर्तुगीज काळात ज्या किल्ल्याची स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारणी केली होती त्या बेतूल येथील किल्याच्या देखभालीकडे राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे या किल्याचे एकेक बुरूज आता ढासळायला लागले आहेत. मागच्या आठ दिवसांत या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे किल्ल्याच्या पायवाटेवरील कडा कोसळायला लागल्या आहेत. किल्ल्याच्या भिंतीजवळ मोठमोठे ख•s पडले आहेत. जागोजागी पडलेल्या अशा ख•dयांमुळे या किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पोर्तुगीज काळात 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याबरोबरच काणकोण तालुक्यातील काब-द-राम किल्ल्याचे देखील काम केले होते. ऐतिहासिक महत्त्वाच्या या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करायला हवे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आलेले आहेत. बेतूल येथील क्षत्रिय मराठा पारंपरिक मच्छीमार समाज दरवर्षी या किल्यावर शिवजयंती साजरा करत असतो. त्यावेळी या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची पूजा करण्याबरोबर अभिषेक करण्यात येत असतो, अशी माहिती येथील प्रमोद जुवेकर, सज्जन जुवेकर या नागरिकांनी दिली.
पुरातत्त्व विभागाकडून देखील मागच्या दोन वर्षांपासून या किल्ल्यावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचप्रमाणे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. दरवर्षी देशी तसेच विदेशी पर्यटकांची आणि इतिहासप्रेमींची या किल्ल्यावर वर्दळ असते. मात्र गोवा मुक्त होऊन 60 वर्षे उलटली, तरी ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्याच्या देखभालीकडे आणि आवश्यक त्या सुधारणांकडे सरकारने जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे दिलेले नाही, अशी खंत स्थानिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली. सध्या बेतूल किल्ल्याची स्थिती विदारक अशी झालेली आहे. हा किल्ला जपून ठेवणे भावी पिढ्यांच्या त्याचप्रमाणे ऐतिहासिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे मत या भागातील नागरिकांनी व्यक्त केले.