अन्यथा आंदोलन : विविध कन्नड संघटनांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
रोहितचक्र तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली असलेले पाठय़पुस्तक नियामक मंडळ हे भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण दिले जाणार आहे. तेव्हा हे नियामक मंडळ बरखास्त करावे व पूर्वीचे बरगूर रामचंद्राप्पा यांच्या अध्यक्षतेखाली असलेले नियामक मंडळ कायम करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा पुरोगामी विचारसरणीच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सध्याच्या पाठय़पुस्तकातून पी. लंकेश, देवगूर महादेव, सारा, अबुबकर, बी. टी. ललितानायक, अरविंद मालगत्ती यांचे लेख या अभ्यासक्रमातून वगळण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, नारायण गुरू, पिरीयार यांचेदेखील धडे वगळण्यात आले आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय लाथाडण्याचा हा प्रयत्न झालेला आहे. तेव्हा त्याचा आम्ही निषेध करत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
रोहितचक्र तीर्थ हे अनुभवी नाहीत. शिक्षण क्षेत्रात तज्ञही नाहीत. सध्याचा जो अभ्यासक्रम ठरविण्यात आला आहे. तो विद्यार्थ्यांसाठी एक विषच असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. तेव्हा ही समिती बरखास्त करावी आणि बरगूर रामचंद्राप्पा यांच्या अध्यक्षतेखालील ठरविण्यात आलेला पाठय़क्रम कायम ठेवावा, असे या निवेदनात म्हटले आहे. जर यामध्ये बदल झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.