तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांची गैरसोय : मनपाने दाखले उपलब्ध करण्याची मागणी
बेळगाव : जन्म व मृत्यू दाखले सेवा केंद्रांवर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या विभागातून दाखले देण्याचे बंद करण्यात आले होते. मात्र, आता सेवा केंद्रांवरदेखील जन्म-मृत्यू दाखले मिळणे कठीण बनले आहे. महिन्याभरापासून दाखले देण्याचे बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेत दाखले देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ई-जन्मच्या माध्यमातून सिंधू सेवा पोर्टलद्वारे जन्म-मृत्यू दाखले देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. सेवा केंद्रांवर हे दाखले घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. केवळ दुरुस्ती, नावनोंदणी आदीकरिता अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे शहरवासियांची गैरसोय होत आहे. सेवा केंद्रांवर जन्म व मृत्यू दाखल्याच्या पहिल्या प्रतीसाठी 50 रुपये आकारणी केली जात आहे. महापालिकेत पहिली प्रत मोफत देण्यात येत होती. तर दुसऱ्या प्रतीसाठी 10 रुपये आणि त्याहून अधिक 5 रुपये आकारण्यात येत होते. मात्र, सेवा केंद्रांवर पहिल्या प्रतीसाठीच 50 रुपये आणि त्याहून अधिक प्रतीकरिता प्रत्येकी 10 रुपये आकारले जात आहेत. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. काही सेवा पेंद्रांवर पहिल्या प्रतीसाठी 100 रुपये घेतले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
मात्र, अलीकडे सेवा केंद्रांवरदेखील दाखले मिळणे बंद झाले आहे. सर्व्हरची समस्या असल्याचे सांगून दाखले देण्याचे बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सेवा सिंधू पोर्टलद्वारे दाखले दिले जात होते. मात्र, आता ई-जन्म प्रणालीद्वारे दाखले वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने दाखले देण्याचे बंद आहे. मात्र, सध्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी केवळ एक प्रत महापालिका कार्यालयात वितरित करण्याची सूचना केली असल्याचे सांगितले. पण सध्या सेवा केंद्रांवर दाखले मिळत नसल्याने नागरिकांना आवश्यक असलेले दाखले महापालिका कार्यालयातच वितरित करण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.