प्रतिनिधी/ बेळगाव
मुलांना कष्टाची जाणीव करून देऊन त्यांच्यावर संस्कार करणे ही काळाची गरज आहे, असे मत डॉ. वंदना गुरव यांनी व्यक्त केले. बी. के. कॉलेजमध्ये आनंद शिक्षण निधी वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी द. म. शि. मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील होते. आनंद ओऊळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद शिक्षण निधी जमा करून 2015 पासून महाविद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत सुरू केली. आजपर्यंत एकूण 105 विद्यार्थ्यांना 5 लाख 15 हजारहून अधिक रुपयांची मदत करण्यात आली. यावर्षी 13 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. आय. वसुलकर यांनी स्वागत केले. गौरी ओऊळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मनीषा कदम यांनी तर आभार प्रा. शुभम चव्हाण यांनी मानले.