वार्ताहर /किणये
6 जून 1986 रोजी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात बेळगुंदी येथे झालेल्या गोळीबारामध्ये भावकू चव्हाण, कलाप्पा उचगावकर, मारुती गावडा या तिघांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्म्यांचे वारसदार आजही सीमाप्रश्न सुटावा यासाठी प्रत्येक लढ्यामध्ये सहभागी होतात. हुतात्म्यांच्या वारसदारांकडून म. ए. समितीचे ग्रामीणचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना देणगी देण्यात आली. सीमाप्रश्नाची सोडवणूक करणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये आर. एम. चौगुले यांनाच विजयी करा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. बेळगुंदी गावातील तिघांनी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनासाठी आपले रक्त सांडले आहे. कल्लाप्पा उचगावकर, मारुती गावडा व भावकू चव्हाण या तिघांच्या स्मरणार्थ बेळगुंदी गावात हुतात्मा स्मारक बांधले आहे. आर. एम. चौगुले यांनी आपला प्रचार करताना बेळगुंदी गावातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. सीमाप्रश्नाच्या लढाईसाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांचे स्मरण करा व समितीला मतदान करा, अशी विनंतीही हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी केली. य् ाावेळी शट्टुपा चव्हाण, जोतिबा उचगावकर, धुळाजी गावडा, अनुराग पाटील, किरण मोटणकर, मारुती शिंदे, शंकर चौगुले, राजू किणयेकर, डॉ. सातेरी, प्रकाश बेळगुंदकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.