ओटीपी क्रमांक घेऊन लुटण्याचे प्रकार वाढीस : लॉटरी अन् तत्सम आमिषांना बळी पडू नका, बँक ग्राहकांना लुटण्यासाठी अनेक टोळ्या कार्यरत
बेळगाव : तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे, ते सुरू करण्यासाठी आधीच्या कार्डवरील 16 अंकी नंबर सांगा, असे सांगत बँक खात्यातील रक्कम हडपण्याचे प्रकार आता जुने झाले आहेत. भामट्यांनी सावजाला ठकविण्यासाठी तंत्रज्ञानातील बदलाचा पुरेपूर फायदा घेतला आहे. आता ओटीपीच्या माध्यमातून ग्राहकांचे बँक खाते रिकामे करण्याच्या उद्योगाने जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी टिळकवाडी येथील राजू सुतार यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. ‘तुम्ही वीजबिल भरले नाही. आज रात्री 10 वाजता तुमची वीजजोडणी तोडण्यात येईल. गैरसोय टाळण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा’, असा तो मेसेज होता. त्यांनी तर पेटीएमवरून वीजबिल भरले होते. तरीही आलेला मेसेज पाहून त्यांना धक्का बसला. मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. ‘आम्ही नेहमी पेटीएमवरून वीजबिल भरतो. यावेळीच काय समस्या झाली आहे?’ अशी विचारणा केली. त्यावेळी भामट्याने त्यांना समाधानाने सांगितले, की ‘पेटीएमवरून वीजबिलापोटी तुम्ही भरलेली रक्कम जमा झाली नाही. आम्ही एक लिंक पाठवितो. तो अॅप डाऊनलोड करा. त्या अॅपवरून पैसे भरा. तर तुमचे काम होईल’ असे सांगितले.
राजू यांनी अॅप डाऊनलोड करून घेतला. त्यावेळी भामट्याने सांगितले, ‘तुमच्या खात्यावर 12 रुपये पाठविले आहेत. ते जमा झाले आहेत का पहा. तुमच्या मेसेज बॉक्समध्ये एक ओटीपी क्रमांक आला आहे. तो कळवा.’ असे सांगण्याच्या तयारीत असतानाच राजू यांना धोक्याची जाणीव झाली. म्हणून त्यांची फसवणूक टाळली. जर त्यांनी ओटीपी क्रमांक दिला असता तर भामट्याने त्यांचे बँक खातेच रिकामी केले असते.एका सराफी पेढीत सोने खरेदी केल्यानंतर ऑनलाईन रक्कम देण्याचे सांगून ग्राहकाने सराफाच्या खात्यावर दहा रुपये पाठविले. ते पोचले आहेत का पहा? कारण मोठी रक्कम ट्रान्स्फर करण्याआधी खात्री केलेली बरी. असे सांगत सराफाकडून ओटीपी नंबर मागून घेतला. थोड्या वेळात सोने खरेदीच्या बदल्यात पैसे यायचे तर राहिलेच. सराफाच्या खात्यातील पैसेही गायब झाले होते. भामट्याने विचारणा केल्यानंतर ओटीपी क्रमांक दिल्यामुळे हे शक्य झाले. सध्या बँकिंग असो किंवा इतर कोणत्याही व्यवहारात ओटीपी गरजेचा असतो. ओटीपी म्हणजेच ‘वन टाईम पासवर्ड’. ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून खात्री करण्यासाठी बँका आपल्या ग्राहकाच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक पाठवतात. जर तो क्रमांक भामट्याच्या हाती लागला तर त्याच्या माध्यमातून भामटा त्यांना पूर्णपणे लुटू शकतो. बँक ग्राहकांना लुटण्यासाठी अशा अनेक टोळ्या कार्यरत आहेत.
बेळगाव परिसरात ओटीपी क्रमांक मागवून ग्राहकांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. व्यापारी व उद्योजकांचीही लूट ओटीपीच्या माध्यमातून झाली आहे. यापूर्वी केवळ एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, असे सांगत बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत होती. खासकरून या उद्योगात जामतारा (झारखंड) गुन्हेगार सक्रिय असतात. आता मालवेअरच्या माध्यमातून एखाद्याच्या मोबाईलमध्ये शिरून त्याच्या बँक खात्यात काय चालले आहे? यावर लक्ष ठेवले जाते. बँक खाते, आधारकार्ड, पॅनकार्ड असो प्रत्येक ठिकाणी मोबाईल क्रमांक जोडलेला असतो. खात्रीच्या व्यवहारासाठी फक्त एकावेळी वापरण्यासाठी वन टाईम पासवर्ड पाठविण्यात येतो. गुन्हेगार ग्राहकाचा विश्वास संपादन करून तो पासवर्ड मिळवतात आणि त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून बँक खात्यात घुसून त्याच्या खात्यातील रक्कम उकळतात. ओटीपी कधी चार अंकी तर आणखी कधी सहा अंकी असतो. आर्थिक व्यवहारात तर ओटीपीशिवाय काहीच चालत नाही. अनेक औषध कंपन्या आपल्या ग्राहकांना 10 ते 15 टक्के औषध खरेदीवर सूट देताना त्याच्या मोबाईलवर ओटीपी पाठवतात. तो क्रमांक सांगितल्यानंतरच सूट मिळते. प्रत्येक आर्थिक व्यवहारात ओटीपीला महत्त्व असते. हे ओळखून सायबर गुन्हेगारांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. उद्योजक, बडे व्यापारी यांच्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही ते टार्गेट करतात.
बेळगाव शहर व जिल्ह्यात असे प्रकार नित्याचेच
एखाद्या ग्राहकाशी संपर्क साधून तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. ती रक्कम तुमच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करायची आहे, असे सांगत ग्राहकाचा विश्वास संपादन केला जातो. 10 ते 15 रुपये रक्कम जमा केली जाते. थोड्या वेळात उर्वरित रक्कम जमा होणार आहे. त्याआधी तुमच्या मेसेज बॉक्समधील ओटीपी क्रमांक कळवा, असे सांगत त्या ग्राहकाच्या खात्यात असेल तितकी रक्कम रिकामी केली जाते. बेळगाव शहर व जिल्ह्यात असे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
ओटीपी शेअर करू नये!
कोणीही कोणाला फुकटचे पैसे देत नाहीत. अशा परिस्थितीत लाखो रुपयांची लॉटरी कशी लागते? फुकटचा पैसा मिळणार, या आशेने जे हुरळून जातात, तेच नेमके स्वत:जवळ असलेलेही गमावून बसतात. समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक सुरू आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवरून तर फेक आयटी तयार करून आजारी असल्याचे सांगून भलत्याच व्यक्तींच्या नावे पैसा जमा केला जातो. आता ओटीपी मागवून फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने जर ओटीपी मागितलेला ओटीपी दिला तर तुमची फसवणूक ही शंभर टक्के ठरलेली आहे. म्हणून कोणाबरोबरही ओटीपी शेअर करू नका, असे सायबर क्राईम विभागाकडून वारंवार आवाहन केले जाते.