95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात भारताच्या शिरपेचात दोन मानाचे तुरे खोवले गेले आहेत. यंदाचा सोहळा भारतासाठी फारच खास होता. ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला सर्वोत्तम ऑस्कर मिळाला. दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्वीस आणि गुनीत मोंगा यांनी तो स्विकारला. भारतीयांची सकाळ या बातमीनेच सुरू झाली आणि आणखी एका ऑस्करची प्रतिक्षा लाभली. कारण, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. अमेरिकेत ज्या पध्दतीने हे गाणे लोकप्रिय होऊन समाजमाध्यमावर धिंगाणा घालत होते त्यावरुन अमेरिकन प्रेक्षक या गाण्याला उचलणार याची खात्री होती…आणि संगीतकार एम.एम. किरावानी आणि चंद्रबोस यांनी ऑस्कर स्वीकारला! पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, “मी सुतार कारागिरांची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर आहे’’. ‘आरआरआर’ बद्दल सर्वच बोलतील. कारण तो रसिकांच्या परिचयाचा आहे. पण, ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाचे तसे नाही. त्याबद्दल जाणूनच घेतले पाहिजे. ओटीटी नेटफ्लिक्सवर हा माहितीपट आहे. तामिळनाडूमध्ये मदुमलई म्हणून जंगली हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱया जंगलातील हत्तींची आई म्हणून प्रसिद्ध असणारी स्त्री बेल्ली आणि पुजारी व माहूत बोमन यांच्या जीवनाचा हा माहितीपट आहे. तामिळनाडूच्या जंगलातील हे आदिवासी जोडपे हत्तींच्या महिनाभर वयाच्या कळपातून हरवलेल्या पिलांचा सांभाळ करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. उन्हाळय़ात पाणी, गवत न मिळाल्याने अन्नाच्या शोधात जंगली हत्ती स्थलांतर करतात. मोठे हत्ती गतीने निघून जातात पण त्यांच्या महिना, दोन महिन्याच्या पिलांना कुत्रे, लांडगे यांच्या हल्ल्यातून स्वतःला वाचवावे लागते. कळपापासून हरवलेल्या अशा बाळहत्तींचा आत्मीयतेने सांभाळ करणारे आणि त्यांच्याशी हितगुज करत त्यांना लहानाचे मोठे करणारे बेल्ली आणि बोमन या हत्तीशी कसे वागतात, त्यांचे नखरे कसे झेलतात, त्यांचे रुसवे-फुगवे, आजारपण ते कसे काढतात याची माहिती या 40 मिनिटांच्या पटातून दिग्दर्शिका कार्तिकी यांनी जगासमोर आणली आहे. मात्र त्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत, ते हा भव्य दिव्य माहितीपट, त्यातील सुंदर दृश्यांकन, जंगलातील प्राण्यांचे चित्रीकरण, वनसंपदा आणि हत्तींचे विविध भाव पाहताना जाणवते. जगाच्या कानाकोपऱयातील माणसाचे मन हळवे करेल असा हा माहितीपट त्यामुळेच पुरस्कार प्राप्त ठरला. ‘आरआरआर’ चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेले हे पहिले गाणे आहे, ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ज्या गाण्याने जगातील प्रत्येक ऐकणाऱयाला अर्थ माहिती नसतानाही थिरकायला लावले. अभिनेता राम चरण तेजा आणि एन टी रामाराव ज्युनिअर यांनी ज्या गतीने ‘नाटू नाटू’ या धमाकेदार गाण्यावर युरोपियन पोशाखात गतीमान नाच केला आहे. त्याची सोशल मीडियावर अनेकांनी नक्कल करत रिल्स बनवली. त्यामुळे आधी समाजमाध्यमावर हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. नंतर त्यासारख्याच किंवा वेगळय़ा स्टेपद्वारे नृत्याची अभिव्यक्ती होऊ लागली. परिणामी चित्रपटाने अमेरिका, जपान मध्येही अभूतपूर्व असा गल्ला भरून घेतला. एका बाजूला भारतीय स्वातंत्र्य युद्धाची पार्श्वभूमी आणि दुसरीकडे सध्या रशियन युद्धात होरपळत असलेल्या युपेनच्या राष्ट्रपती भवनासमोर चित्रीकरण झालेले हे गाणे असा दुहेरी लाभ याला झाला. पूर्वी असेच ए. आर. रहमान अमेरिकेत लोकप्रिय झाले होते. त्या लोकप्रियतेला पुरस्कृत करण्याची संधी म्हणून ‘जय हो’ या गाण्याला ऑस्कर मिळाला. भारतीयांचे मन त्यावेळीही भरून आले होते. मात्र त्याचे गीतकार गुलजार मात्र मर्यादित आनंद व्यक्त करत होते. आपल्या याहून अनेक चांगल्या कलाकृती बेदखल झाल्या याची त्यांना आजही खंत आहे. दोन ऑस्कर मिळवून भारताने अमेरिकन चित्रपटसृष्टीत आपला गौरव अजून वाढवत नेला आहे. मात्र, आपल्या चित्रपटांचा खरा कस कॅन महोत्सवातच लागू शकतो आणि तेथील गंभीर ज्युरी आणि प्रेक्षकांची वाहवा जेव्हा भारतीय चित्रपटांना मोठय़ा प्रमाणावर मिळेल तेव्हाच भारताची चित्रपटसृष्टी भरुन पावेल. भारतीयांना ‘नाटू नाटू’ पेक्षा अधिक लोकप्रिय गाण्यांची सवय असल्याने युवा पिढीकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला तरी हे काही पूर्णांशाने यशस्वी भारतीय गीत आहे अशी भारतीयांची तरी धारणा बनू शकणार नाही. या गाण्यापूर्वीही अशी अनेक गाणी भारतात लोकप्रिय झाली आणि कालौघात ‘सामी’ किंवा ‘शांताबाई’ झाली आहेत. आणि असंख्य शाश्वत गाणी शतकावर मात करून आजही भारतीय मनावर अधिराज्य गाजवत आहेत. भारतीय आदिवासींच्या कहाण्या जगाला नेहमीच सुखावतात. पूर्वी भारताला त्यामुळे साप, गारुडय़ांचा देश म्हणूनही हिणवले गेले. आज व्हिस्परर्सच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचे कौतुक आणि आरआरआरच्या निमित्ताने भारतीय संगीताचे कौतुक होत असले तरी जगाची आपल्याकडे बघण्याची मानसिकता यातून बदलणार आहे का? हा वास्तविक प्रश्न भारतीयांनी मनाला आणि भारतीय कलाकारांनी सिनेजगाला विचारण्याची गरज आहे. अर्थात आजचा दिवस कौतुकाचा आणि आनंदाचा. पण त्याकाळातही आपले स्वत्व खऱया अर्थाने जाणणेही महत्त्वाचेच! त्यासाठीच आजच्या राईज, रोअर, रिवोल्ट, व्हिस्परर्स प्रसंगी हे हितगूज!…
Previous Articleसर्वोच्च न्यायालयाचा अखिलेश यांना दिलासा
Next Article सर्व युद्धनौका होणार क्षेपणास्त्रसज्ज
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.