नाल्यातील सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचणी : महापालिकेच्या पथकाकडून समस्येचे निवारण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील नाल्यांची स्वच्छता केली असल्याचे सांगण्यात येते. पण पावसामुळे अनेक ठिकाणी नाले तुंबले असल्याने सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण झाली आहे. मात्र नाल्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांसह डेनेजच्या वाहिन्यादेखील वाहून आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण होण्यास महापालिका की नागरिक जबाबदार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
पावसाचे पाणी तुंबले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेच्यावतीने विविध उपाय-योजना राबवून समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. शिवाजीनगर, वीरभद्रनगर तसेच समर्थनगर, शास्त्रीनगर अशा विविध परिसरात नाल्यातील सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचणी निर्माण होतात. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे किल्ला परिसरात नाल्यामध्ये कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा झाला नाही.
सोमवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने धाव घेऊन या समस्येचे निवारण केले. पण या ठिकाणी साचलेल्या कचऱयामध्ये थर्मेकोल आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ड्रेनेजवाहिन्या घालण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाईपदेखील नाल्यातून वाहून आल्याचे निदर्शनास आले.
परिस्थितीला जबाबदार कोण?
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मेकोल अशा विविध वस्तू नाल्यामध्ये किंवा गटारीमध्ये टाकू नये, असे आवाहन सातत्याने केले जाते. तरीदेखील नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कचऱयाची उचल करूनदेखील प्लास्टिकच्या बाटल्या नाल्यामध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत. पण त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. एकीकडे नाला स्वच्छता मोहीम राबविली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येते. तर दुसरीकडे प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा कचरा नाल्यात टाकला जातो. त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित होत आहे. नाले व गटारी तुंबण्यास नागरिक जबाबदार असल्याचा आरोप मनपाचे अधिकारी करीत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या पुनर्वापरासाठी घेतल्या जातात. पण कचरा जमा करणाऱयांकडे प्लास्टिकच्या बाटल्या देण्याऐवजी नाल्यामध्ये टाकण्यात येत आहेत. त्यामुळे नाले तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. कोनवाळ गल्ली नालादेखील प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांनी भरलेला असतो. वारंवार स्वच्छता मोहीम राबवून कचरा काढला जातो.