उष्णता कमी झाल्याने नागरिकांना दिलासा
कोल्हापूर प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजता पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सुमारे तीस मिनिटे आलेल्या रिमझिम पावसामुळे लोकांची धांदल उडाली. या पावसामुळे उष्णता कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गुरूवारी कोल्हापूर जिल्ह्यातील कोकण पट्ट्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात मात्र रिमझिम पावसाच्या सरी आल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. गेल्या चार दिवसापासून वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील फळे, भाजीसह इतर साहित्य विक्रेत्यांची धांदल उडाली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाशात ढग मात्र कायम होते.
पूर्व भुदरगडात मेघगर्जनेसह वळवाचा जोरदार तडाका
कूर : पूर्व भुदरगड तालुक्याच्या कूर परिसरात गुऊवारी सायकांळी पहिल्या वळीव पावसाने मेघर्जनेसह तब्बल एक तास जोरदार हजेरी लावली. पूर्व भुदरगड तालुक्यातील पंचवीस गावातील शेतीच्या मशागत व ऊस पिकांना पाऊस वरदान ठरला आहे.