वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे
कोल्हापूर प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीने ओबीसींमध्ये जनजागृतीसाठी राज्यभर ओबीसी संवाद मेळावा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून ओबीसींच्या हक्कासाठी लवकरच राज्यभर तवा फिरवा आंदोलन केले जाईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी दिली.येथील प्रेस क्लबमध्ये गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सदस्या क्रांती सावंत, उपाध्यक्ष गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विलास कांबळे, संतोष सुळकुडे, महादेव कांबळे उपस्थित होते.
प्रा. साळुंखे म्हणाले, आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सुचनेनुसार राज्यभर ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. ओबीसी समाजाच्या जनगणनेच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण आणि नोकऱ्यांतून ओबीसींना सातत्याने डावलण्यात येत आहे. उच्च शिक्षणातील आरक्षणाचा पूर्ण लाभ ओबीसींना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
क्रांती सावंत म्हणाल्या, देशात ओबीसींच्या अनेक जाती आहेत, या मायक्रो समाजाला सातत्याने डावलण्यात येत आहे, यावर चर्चा होण्यासाठी राज्यभर ओबीसी संवाद मेळावा घेण्यात येत आहे. आघाडीच्या संवाद यात्रेचा दुसरा टप्पा कोल्हापुरातून सुरू होत आहे. याद्वारे ओबीसींच्या जातनिहाय गणनेची मागणी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यभर तवा फिरवा आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सत्तासंघर्षाचा निकाल भाजपला अपेक्षित : प्रा. साळुंखे
प्रा. सोमनाथ साळुंखे म्हणाले, राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भातील निकाल भाजपला अपेक्षित असाच लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सभापतींवर सोपवला आहे. राज्यातील सरकार 14 महिने निर्णय घेऊ शकलेले नाही. त्यामुळे जनतेच्या भावनेशी सरकार खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला.