केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत अंमलीपदार्थ विरोधी दलाची कृती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आभासी उपस्थितीत 30 हजार कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले असून ही कारवाई दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या चार शहरांमध्ये शनिवारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अंमलीपदार्थ विरोधी दलाने देशभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून हे अंमलीपदार्थ गेल्या दोन वर्षात जप्त केले होते. एकंदर 75 हजार किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून ते टप्प्याटप्प्याने नष्ट करण्यात येणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंमलीपदार्थांविरोधात निर्णायक कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्टपर्यंत 1 लाख कोटी अंमलीपदार्थ नष्ट केले जाणार आहेत. आतापर्यंत या वर्षात 81 हजार 686 किलो अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 हजार किलो ड्रग्ज नष्ट करण्याचे लक्ष्य दिले होते. ते पूर्ण करून शिवाय अधिक प्रमाणात ड्रग्ज नष्ट केले जातील, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
1 जूनपासून अभियान
1 जून 2022 पासून अंमलीपदार्थ नष्ट करण्याचे अभियान केंद्र सरकारने हाती घेतले आहे. अकरा राज्यांमध्ये हे अभियान चालविले जात आहे. शनिवारी नष्ट करण्यात आलेले 30 हजार 468 किलो अंमलीपदार्थ धरून आतापर्यंत 81 हजार 686 किलो पदार्थ जाळून टाकण्यात आले आहेत. ही अंमलीपदार्थ विरोधी दलाची महत्त्वाची उपलब्धी असून आतापर्यंतचा विक्रम असल्याचे बोलले जात आहे.
दिल्लीत सर्वाधिक
शनिवारी देशाची राजधानी दिल्ली येथे सर्वाधिक 19 हजार 320 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले. त्याखालोखाल आसामची राजधानी गुवाहाटी येथे 6 हजार 761 किलो, कोलकाता येथे 3 हजार 77 किलो आणि चेन्नई येथे 1 हजार 309 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने अंमलीपदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारलेले आहे, अशी माहिती देण्यात आली.
अमित शहांच्या नेतृत्वात परिषद
शनिवारी चंदीगढ येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेत अंमलीपदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर एक परिषद पार पडली आहे. या परिषदेत अंमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासंबंधी महत्त्वाची चर्चा झाली असून अनेक उपाय सुचविण्यात आले आहेत. पंजाबमध्ये अंमलीपदार्थांचा सुळसुळाट सर्वाधिक असून तेथील तरुणाई मोठय़ा प्रमाणावर ड्रग्जच्या आहारी गेली असल्याचा इशारा तज्ञांनी या परिषदेत दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी त्वरित कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याची आवश्यकता असून तसे न केल्यास ड्रगमाफियांचा प्रभाव अधिकच वाढेल, असे सांगण्यात आले.
अमित शहा यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक तसेच जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, मुख्य सचिव आणि चंदीगढचे जिल्हा पोलीस संचालक तसेच पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.