माजी मंत्री दिलीप परूळेकर, जयेश साळगावकर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष
प्रतिनिधी/पर्वरी
साळगाव मतदारसंघातील काँग्रेस आमदार केदार नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे साळगाव मतदारसंघातील अनेक दिग्गज नेत्यांची गोची झाली आहे. पक्षाचे माजी दोन मंत्री दिलीप परूळेकर आणि जयेश साळगावकर हे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाईक हे मूळ भाजपचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षातर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. पण ऐनवेळी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या जयेश साळगावकर यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाईक यांनी बंडखोरी करून ‘टुगेदर फॉर साळगाव’ हा स्वातंत्र गट स्थापन केला व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून विजयी झाले होते. निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकत्यांनी एकमेकावर चिखलफेक केली होती. त्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली होती. आताच कुठेतरी त्यांची मने सावरत असतानाच नाईक यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजप पक्षात पुन्हा प्रवेश केल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांना नेमकी कोणती भूमिका घ्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत परूळेकर आणि साळगावकर हे नाईक यांना सहकार्य करतील, असे वाटत नाही.
गेल्या निवडणुकीत परूळेकर यांना उमेदवारी नाकारली असतानाही त्याने सावध भूमिका घेत पक्षाचा त्याग केला नाही. साळगावकर यांचा वरवर प्रचार केला. पण खरी गोची साळगावकर यांची झाली आहे. कारण त्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे दरवाजे पूर्ण बंद झाले आहेत. तसे वक्तव्य गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी नुकत्याच एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जाहीर केले आहे. साळगावकर हे ‘ना घर का, ना घाट का’ अशी स्थिति झाली आहे.
राज्य कार्यकारिणीला याचा अंदाज आला असून सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अध्यक्ष सदानंद तानवडे शिवोली आणि साळगाव मतदारसंघातील कार्यकत्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघात भंडारी समाजाचे वर्चस्व आहे. या सर्व गडबडीचा परिणाम 2024च्या लोकसभा निवडणुकीवर होणार नाही. याची दक्षता पक्षाने घेणे आवश्यक आहे.