ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएल आणि एफएस प्रकरणी ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांना यापूर्वी 11 मे ला ईडीने समन्स पाठवलं होतं. त्यामध्ये 15 मे ला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जवळच्या नातेवाईकांचे लग्न असल्याने पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली होती. ईडीनेही त्यांची विनंती मान्य करत त्यांना 22 मे रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.
आयएल आणि एफएस या कंपन्यांनी जयंत पाटील यांच्या संस्थांना कमिशन स्वरुपात काही रक्कम दिल्याचा ईडीचा आरोप आहे. याच व्यवहारांची ईडी पाटील यांच्याकडे चौकशी करणार आहे. दरम्यान, त्या कंपन्यांसोबत माझा एक रुपयाचाही व्यवहार नसल्याचे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.