प्रतिनिधी /बेळगाव
केएलएस, जीआयटीच्या एमबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी हुबळीनजीक तडस-हणगल रोडवरील अगडीतोटा येथे शैक्षणिक सहल काढली. 188 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी उंचावणे, गटामध्ये काम करताना कौशल्य विकास करणे, संवाद कौशल्य, नेतृत्व, वेळेचे नियोजन, निर्णय क्षमता, समस्या सोडविणे, प्रेरणा देणे व वैयक्तिक विकास यावर या सहलीत भर देण्यात आला.
या उपक्रमाचे प्रा. जयंत कित्तूर यांनी कौतुक करून ओरिएंटेशन आणि इंडक्शन हे कार्यक्रम बाह्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरतात, असे सांगितले. या विभागाचे डीन डॉ. कृष्णा शेखरलाल दास यांनी अशा उपक्रमांमुळे नेतृत्व गुण वाढीस लागतात व कार्यक्रम आयोजित करण्याचे अनुभवही येतात, असे सांगितले. कार्यकारी मंडळाचे चेअरमन प्रमोद काठवी यांनी एमबीए विभागाचे अभिनंदन केले.