ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दुहेरी हत्याकांडाने बिहार हादरलं आहे. भाजपाचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांचे भाऊ शंभू शर्मा (वय 32) आणि गौतम शर्मा (28) यांची गँगवॉरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पटनामधील नीमा गावात मंगळवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन म्हणाले, या हत्याकांडात नीमा येथील पांडव टोळीचा म्होरक्या संजय सिंह याचा हात असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी संजय सिंह यांचा जवळचा सहकारी सुधीर शर्मा याची धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करत हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात माजी आमदार चित्तरंजन शर्मा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं नाही. याचा सूड घेण्यासाठी चित्तरंजन शर्मा यांच्या दोन्ही भावांची हत्या करण्यात आली.
मृत शंभू हा चार्टर्ड अकाउंटंट होता. तर दुसरा मृत भाऊ गौतम हा एका वेब पोर्टलमध्ये पत्रकार म्हणून काम करत होता. माजी आमदार चित्तरंजन हे पूर्वी आपल्या भावांची हत्या करणाऱ्या पांडव टोळीचे सदस्य होते. मात्र, नंतर ही टोळी फुटल्याने चित्तरंजन आणि संजय हे वेगळे झाले होते. या टोळीवर जहानाबाद, पाटणासह अनेक जिल्ह्यात खंडणी, खून, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत.